ऑनलाइन लोकमत
गॉल (श्रीलंका), दि. १५ - पहिल्या डावात चांगली आघाडी घेऊनही भारताने श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ६३ धावांनी गमावल्याने स्वातंत्र्यदिनी पहिली कसोटी जिंकण्याचं स्वप्न भंगल आहे. जिंकण्यासाठी अवघ्या १७६ धावांचे आव्हान समोर असताना दुस-या डावात भारताचे सर्व गडी ११२ धावांवर बाद झाले आणि श्रीलंकेने पहिली कसोटी जिंकत मालिकेत १- अशी आघाडी घेतली. श्रीलंकेच्या हेराथने ७ फलंदाजांना तंबूत पाठवले तर कौशलने ३ फलंदाजांना बाद केले.
भारतीय क्रिकेट संघाच्या फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकी द्वयीनी चांगलाच झटका दिला. काल खेळ संपला तेव्हा भारताने एक गडी गमावत २३ धावा केल्या होत्या. मात्र आज भारताचे उरलेले फलंदाज पटापट हजेरी लावून तंबूत परतले. पहिल्या डावात शानदार शतकी खेळी करणारे शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. एकट्या अजिंक्य रहाणेने (३६) शेवटपर्यंत झुंज दिली मात्र त्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आणि भारताला पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे के.एल.राहुल (५), शिखर धवन (२८), इशांत शर्मा (१०), रोहित शर्मा (४), कोहली (३), सहा (२), हरभजन (१), अश्विन ३, मिश्रा (१५) आणि वरुण अॅरॉनने नाबाद १ धाव केली.
संगकारा निवृत्त
श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकाराची ही कारकिर्दीतील अखेरची कसोटी होती. आपल्या आवडत्या खेळाडूला निरोपाची भेट म्हणून ही कसोटी जिंकण्याचा श्रीलंकंन खेळाडूंचा इरादा होता आणि त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. पहिला कसोटी सामना संपल्यावर संगकाराने मैदानावर फेरी मारून सर्व चाहत्यांचे आभारही मानले.