आयपीएलमध्ये भारताचे सर्वांत यशस्वी पाच कर्णधार
By Admin | Updated: May 3, 2016 03:51 IST2016-05-03T03:51:54+5:302016-05-03T03:51:54+5:30
आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही

आयपीएलमध्ये भारताचे सर्वांत यशस्वी पाच कर्णधार
- एबी डिव्हिलियर्स लिहितो़..
आयपीएलमध्ये संघाचे नेतृत्व भारतीय खेळाडूनेच करावे, हेच योग्य आहे. काहींचे मत असे आहे, की सर्वांत योग्य व्यक्तीकडे संघाचे नेतृत्व सोपवायला पाहिजे, मग तो खेळाडू कुठल्याही देशाचा असला तरी हरकत नाही. काहींच्या मते ही जबाबदारी भारतीय खेळाडूंवरच सोपवायला पाहिजे. कारण भारतीय खेळाडू संघाला योग्य पद्धतीने प्रोत्साहित करू शकतो. त्याचप्रमाणे त्याला वेगवेगळ्या मैदानांवरील परिस्थितीची चांगली माहिती असते. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने एक महत्त्वाचा निर्णय घेताना संघाचा यशस्वी फलंदाज डेव्हिड मिलरची कर्णधारपदावरून उचलबांगडी करीत मुरली विजयकडे ही जबाबदारी सोपविली. मुरली विजय तमिळनाडूचा कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. दरम्यान, जर परिस्थिती नियंत्रणात असेल तर स्पर्धेत एकच कर्णधार कायम ठेवण्यात येतो.
आयपीएलच्या इतिहासात पाच सर्वांत यशस्वी कर्णधारांची चर्चा केली तर ते सर्व भारतीय आहेत. किमान १५ सामन्यांमध्ये आपल्या संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कर्णधारांच्या विजयाच्या टक्केवारीवर आधार घेतला तर गौतम गंभीर पाचव्या स्थानी आहे. दिल्ली व कोलकाता संघांचा कर्णधार म्हणून ९३ सामने खेळताना त्याची विजयाची टक्केवारी ५५.७ अशी आहे. अनिल कुंबळे या यादीत चौथ्या स्थानी आहे. त्याने आरसीबीतर्फे २६ सामन्यांत संघाचे नेतृत्व केले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५७.६९ टक्के. महेंद्रसिंह धोनीने चेन्नई व पुणे संघाचे १३९ सामन्यांत नेतृत्व केले असून त्याची विजयाची टक्केवारी आहे ५९.०९ टक्के. तो तिसऱ्या स्थानी आहे. सचिन तेंडुलकरने २००८ ते २०११ या कालावधीत ५१ सामन्यांत मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले. त्याची विजयाची टक्केवारी आहे ६०.७८ आणि तो यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
आकडेवारीचा विचार करता आयपीएलच्या इतिहासात सर्वांत यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहितने २०१३ ते २०१५ या कालावधीत ४४ सामन्यांत मुंबई संघाचे नेतृत्व केले. त्यात २७ सामन्यांत विजय मिळवला, तर १७ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. त्याची विजयाची टक्केवारी ६१.३६ अशी आहे.
आयपीएलमध्ये सर्वांत यशस्वी विदेशी कर्णधाराची चर्चा केली तर अव्वल स्थानी आहे शेन वॉर्न. महान आॅस्ट्रेलियन फिरकीपटूने पहिल्या चार सत्रांत राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद भूषवले आणि आपल्या नेतृत्वाखाली संघाला ५५ पैकी ३० सामन्यांत विजय मिळवून दिला. त्याची विजयाची टक्केवारी आहे ५४.५४ अशी.
नेतृत्व कुणाकडे असावे? या प्रश्नाचे माझ्या मते काही योग्य उत्तर सापडत नाही. कारण नेतृत्व हे कुणा एका खेळाडूपेक्षा संघासोबत जुळलेली बाब आहे. आयपीएल संघाचे नेतृत्व करणाऱ्या विदेशी खेळाडूला स्थानिक खेळाडूचे सहकार्य व समर्थन मिळणे आवश्यक ठरते. एखादा भारतीय खेळाडू जर संघाचे नेतृत्व करीत असेल तर त्यालाही विदेशी खेळाडूच्या अनुभवाचा लाभ मिळत असतो. त्यामुळे या स्पर्धेत कर्णधार कुठल्याही देशाचा असला तरी अडचणीच्या स्थितीत संयम ढळू न देणे महत्त्वाचे आहे. (टीसीएम)