भारताचा दारुण पराभव
By Admin | Updated: November 21, 2014 01:52 IST2014-11-21T01:52:51+5:302014-11-21T01:52:51+5:30
थायलंडविरुद्ध निसटता विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी आशियाई बीच गेम्स स्पर्धेत इराणकडून पराभव पत्करावा लागला.

भारताचा दारुण पराभव
फुकेट : थायलंडविरुद्ध निसटता विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला गुरुवारी आशियाई बीच गेम्स स्पर्धेत इराणकडून पराभव पत्करावा लागला. इराणने ४०-३१ अशा फरकाने भारताला नमवले. २०१२च्या आशियाई बीच स्पर्धेत इराणने ४२-३२ अशा फरकाने नमवत भारताला कांस्यपदकावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. गतविजेत्यांनी त्याच लढतीची पुनरावृत्ती गुरुवारी करून जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली आहे.
कर्णधार राहुल चौधरीने इराणच्या खेळाडूंना सडेतोड उत्तर देत पहिल्या हाफपर्यंत सामना १८-१६ असा अटीतटीचा ठेवला. दुसऱ्या हाफमध्ये मात्र इराणने रणनीती बदलली आणि मेरज शेख व हादी ओश्तोराक यांच्या दमदार चढायांच्या बळावर आघाडी घेतली. अमिऱ्होसेन मोहम्मद मइकी याची पकड करण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आल्याने त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. त्यामुळे इराणने दुसऱ्या हाफमध्ये २२ गुणांची कमाई करीत सामना आपल्या बाजूने झुकवला. भारताला दुसऱ्या हाफमध्ये केवळ १५ गुणांची कमाई करण्यात यश मिळाले. इराणकडून पराभव झाल्यामुळे भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी बांगलादेशवर विजय मिळवणे गरजेचे झाले आहे. (वृत्तसंस्था)