भारतीय संघाला चांगल्या सलामीची गरज
By Admin | Updated: March 4, 2017 00:12 IST2017-03-04T00:12:29+5:302017-03-04T00:12:29+5:30
खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात.

भारतीय संघाला चांगल्या सलामीची गरज
- हर्ष भोगले लिहितो..
खेळाडू खेळपट्टीचा अधिक विचार करताना आपला खेळ विसरून जातात. खेळपट्टी हा खेळाचा महत्त्वाचा भाग आहे, हे खरे असले तरी खेळाडूंचे कौशल्यही महत्त्वाचे ठरते. कुठल्याही खेळपट्टीवर खेळाडूंना किती चांगले खेळता येते, हे सिद्ध करता येते. खेळपट्टी उभय संघांसाठी सारखीच असते, पण खेळाडूंच्या कौशल्याच्या आधारावर यश-अपयश ठरत असते. बंगलोरमध्ये काय घडते याची उत्सुकता आहे.
माझ्या मते बंगलोरची खेळपट्टी चांगली आहे. चांगल्या खेळपट्टीवर चांगला खेळ होतोच, हे सत्य आहे. खेळाडूही आव्हान स्वीकारत कौशल्य सादर करण्यास सज्ज असतात. पुण्यामध्ये स्टीव्ह स्मिथने कौशल्य दाखविले तर लोकेश राहुलने ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.
भारताला मालिकेत पुनरागमन करण्यासाठी आघाडीच्या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. पुणे कसोटीप्रमाणे स्वीकारावा लागलेला पराभव संघाचे मनोधैर्य ढासळण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे कोहली किंवा आश्विनसारख्या खेळाडूंनी अन्य सहकाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न करायला हवा. हे खेळाडू संघाला मालिका विजयाचा मार्ग दाखवण्यास सक्षम आहेत.
भारतीय संघाला सलामीच्या जोडीकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. धावफलकावर बिनबाद ७५ अशी धावसंख्या दिसली म्हणजे संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळते. संघाला मोठ्या धावसंख्येचा पाय रचून देण्याची भूमिका सलामीवीरांना बजवावी लागते. कसोटी सामन्यांत अलीकडच्या कालावधीत भारताला चांगली सलामीची जोडी लाभलेली नाही. सलामीची जोडी डावाचा टोन सेट करू शकते. मी तुल्यबळ क्रिकेट बघण्यास उत्सुक आहे. (पीएमजी)