नेपाळमध्ये सुरू असलेल्या 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या कबड्डी गटात भारतानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारतीय पुरुष व महिला संघानं या स्पर्धेचे जेतेपद नावावर करताना भारताच्या खात्यात दोन सुवर्णपदकांची भर घातली.
महिला गटाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं यजमान नेपाळचा 50-13 असा एकतर्फी पराभव केला. मध्यंतरापर्यंत भारताकडे 14-10 अशी चार गुणांची आघाडी होती. भारताकडून चढाईत सोनाली शिंगटे, पुष्पा, साक्षी कुमारी यांनी, तर दीपिका जोशेप, प्रियांका, रितू नेगी यांनी दमदार खेळ केला.
पुरुष गटात भारतानं श्रीलंका संघावर सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. भारताकडे मध्यंतरापर्यंत 28-11 अशी आघाडी होती. भारतानं हा सामना 51-18 असा जिंकला. पवन कुमार शेरावत, नवीन कुमार, नितेश कुमार, परवेश, विशाल भारद्वाज यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.