चौथ्या सामन्यासह भारताने ३ - ० अशी मालिका जिंकली
By Admin | Updated: December 7, 2015 15:30 IST2015-12-07T15:10:03+5:302015-12-07T15:30:54+5:30
चौथ्या व शेवटच्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव करत भारताने ही मालिका ३ - ० अशी दणदणीत जिंकली आहे.

चौथ्या सामन्यासह भारताने ३ - ० अशी मालिका जिंकली
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - चौथ्या व शेवटच्या कसोटीत दक्षिण अफ्रिकेचा ३३७ धावांनी पराभव करत भारताने ही मालिका ३ - ० अशी दणदणीत जिंकली आहे. चौथ्या कसोटीचा शिल्पकार दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावण्याचा विक्रम करणारा अजिंक्य रहाणे ठरला असून पहिल्या डावात जाडेजाने तर दुस-या डावात अश्विनने पाहुण्यांचा अर्धा संघ गारद केला आणि रहाणेच्या खेळीचे चीज झाले. अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले असून अश्विनने मालिकावीराचा मान पटकावला आहे. सचिन तेंडुलकर व विरेंद्र सेहवाग यांच्या पंक्तीत अश्विन बसला असून मालिकावीराचा मान पाच वेळा पटकावणारा तो तिसरा भारतीय ठरला आहे. दरम्यान, अजिंक्य रहाणेने सामनावीराचे बक्षीस चेन्नईतल्या पूरग्रस्तांना देण्याची घोषणा केली आहे.
हाशिम आमला २४४ चेंडूंमध्ये २५ धावा व ए. बी. डिव्हिलियर्स २९७ चेंडूंमध्ये ४३ धावा, वगळता केवळ बावुमाने ११७ चेंडूंमध्ये ३४ धावा करत सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. दुस-या डावात तब्बल १४२ षटकं किल्ला लढवणा-या अफ्रिकेने एकच्या सरासरीने १४३ धावा केल्या.
चहापानानंतर भारताने अफ्रिकेच्या डेन व्हिलासचा उमेश यादवने त्रिफळा उडवला आणि अश्विनने ए. बी. डिव्हिलियर्सला जाडेजाकरवी झेलबाद करत मुख्य अडथळा दूर केला. पाठोपाठ अॅबटचाही त्रिफळा उमेश यादवने उडवला. तर नंतर पिएटला वृद्धीमान साहाकरवी यादवने झेलबाद केले. मॉर्केलचा त्रिफळा उडवत अश्विनने आपला पाचवा बळी टिपला व अफ्रिकेचा डाव संपुष्टात आला. इमरान ताहीर शून्यावर नाबाद राहिला. दुस-या डावामध्ये अश्विनने पाच गडी बाज केले, तर उमेश यादवने ३ व जाडेजाने दोघांना तंबूत धाडले.
अजिंक्य रहाणेच्या दोन्ही डावांतील शतकांचं भारताच्या विजयामुळं चीज झालं आहे.
भारत वि. दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेची वैशिष्ट्ये :
- मालिकेत सर्वाधिक धावा फटकवणारा फलंदाज - अजिंक्य रहाणे (२६६)
- मालिकेत सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज - आर. अश्विन (३१)
- चौथ्या कसोटीत भारताने आफ्रिकेवर ३३७ धावांनी मिळवला विक्रमी विजय. भारताने एवढ्या मोठ्या धावांच्या फरकाने जिंकलेला हा पहिलाच सामना आहे.