भारत मालिका विजय
By Admin | Updated: June 18, 2014 18:51 IST2014-06-17T22:22:42+5:302014-06-18T18:51:24+5:30
बांगलादेशवर ४७ धावांनी मात : स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्माचा अचूक मारा

भारत मालिका विजय
बांगला देशवर ४७ धावांनी मात : स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्माचा अचूक मारा
भारताचा मालिका विजय
मीरपूर : स्टुअर्ट बिन्नी (४ धावांत ६ बळी) आणि मोहित शर्मा (२२ धावांत ४ बळी) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात यजमान बांगला देशचा ४७ धावांनी पराभव केला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळविली.
पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा प्रारंभ झालेली ही लढत पंचांनी प्रत्येकी ४१ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेतला. फलंदाजांच्या निराशाजक कामगिरीमुळे भारताचा डाव २५.३ षटकांत १०५ धावांत संपुष्टात आला, पण मोहित व बिन्नी यांनी अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यजमान बांगला देशचा डाव १७.४ षटकांत ५८ धावांत संपुष्टात आला. प्रतिस्पर्धी संघाचा भारताविरुद्ध हा धावसंख्येचा नीचांक ठरला.
कारकीर्दीतील तिसरा सामना खेळणारा कर्नाटकचा गोलंदाज बिन्नीने ४.४ षटकांत ४ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. भारतातर्फे वन-डे क्रिकेटमधील ही गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने त्याला योग्य साथ देताना ८ षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. बांगला देशतर्फे मिथुन अली (२६) आणि मुशफिकर रहिम (११) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदविण्यात अपयश आले.