ख्राईस्टचर्च : सलग दोन सामन्यांत न्यूझीलंडला नमवल्यानंतर भारतीय संघ उद्या येथे चौथ्या आणि अखेरच्या हॉकी सामन्यात यजमान संघाला पराभूत करून विजयाची लय कायम ठेवण्यासाठी व मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.नेल्सनमध्ये मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताने पुढील २ सामने जिंकताना न्यूझीलंडला धक्का दिला होता. उद्या अखेरच्या लढतीत भारत आपली आक्रमक व्यूहरचना कायम ठेवेल आणि न्यूझीलंडवर दबावात टाकून सुरुवातीलाच गोल करण्याचा प्रयत्न करेल. भारताच्या फॉरवर्ड फळीने शानदार कामगिरी केली आणि न्यूझीलंडच्या डिफेंडरांना मागे ढकलण्यात यश मिळविले आहे. निक्कीन थिमैया, आकाशदीपसिंग आणि एस. व्ही. सुनील यांनी सातत्याने हल्ला करताना यजमान संघाच्या डिफेन्सला लय मिळू न देण्याची संधी दिली नाही.कर्णधार सरदारसिंगच्या नेतृत्वाखालील मिडफिल्डने फॉरवर्ड फळीला चांगली साथ दिली आहे. गेल्या सामन्यात अंतिम क्षणी गोल करणारा धरमवीरसिंग, एस. के. उथप्पा, देविंदर वाल्मीकी आणि चिंगलेसानासिंग अंतिम सामन्यात शानदार कामगिरी कायम ठेवण्याच्या इराद्याने खेळतील.(वृत्तसंस्था)
भारत-न्यूझीलंड लढत आज
By admin | Updated: October 11, 2015 04:56 IST