विक्रमी विजय नोंदवण्यास भारत उत्सुक
By Admin | Updated: March 10, 2015 01:15 IST2015-03-10T01:15:55+5:302015-03-10T01:15:55+5:30
विश्वकप स्पर्धेत इतिहास नोंदवण्याच्या उंबरठ्यावर असलेला भारतीय संघ मंगळवारी आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत शानदार विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

विक्रमी विजय नोंदवण्यास भारत उत्सुक
हॅमिल्टन : विश्वकप स्पर्धेत इतिहास नोंदवण्याच्या उंबरठ्यावर असलेला भारतीय संघ मंगळवारी आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत शानदार विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.
आयर्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारतच वर्चस्व गाजवेल. दुसऱ्या बाजूचा विचार करता आयर्लंड संघ ‘ब’ गटात चौथे स्थान पटकावीत उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास प्रयत्नशील असेल, असे जाणकारांचे मत आहे. गेल्या विश्वकप स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघांदरम्यान बेंगळुरूमध्ये लढत झाली होती. त्या सामन्यात यजमान संघाने पाच गडी राखून विजय मिळवला होता. युवराज सिंगने अर्धशतकी खेळी करीत पाच बळी घेतले होते.
२०१५ च्या विश्वकप स्पर्धेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. चार सामन्यांत भारतीय गोलंदाजांनी ३७ बळी घेतले आहेत. त्यात भुवनेश्वर कुमारने संयुक्त अरब अमिरातविरुद्धच्या लढतीत १ बळी घेतला होता. उर्वरित पाच गोलंदाजांनी ३६ बळी घेतले आहेत.
आश्विन व मोहंमद शमी यांनी प्रत्येकी ९; तर उमेश यादव, मोहीत शर्मा व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी ६ बळी घेतले आहेत. गोलंदाजांची प्रतिषटक सरासरीही चांगली आहे. सर्वांत महागडा ठरलेल्या जडेजाने प्रतिषटक ४.५१ च्या सरासरीने धावा बहाल केल्या आहेत.
यादवची प्रतिषटक सरासरी ४.३३ आहे; तर शमीने प्रतिषटक ४ धावा दिल्या आहेत. आश्विनने ३.९१ व मोहीतने ३.९० प्रतिषटक सरासरीने गोलंदाजी केली आहे.
सेडन पार्क मैदान लहान असल्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखणे भारतीय गोलंदाजांसाठी आव्हान ठरणार आहे. भारतीय फलंदाज मात्र याचा लाभ घेण्यास उत्सुक आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध गेल्या लढतीत फिनिशर ठरलेल्या महेंद्रसिंह धोनीसह आघाडीच्या सात फलंदाजांच्या खात्यावर किमान एका चांगल्या खेळीची नोंद आहे.
पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनुक्रमे ७७ व १३७ धावांची खेळी करणारा शिखर धवन मोठी खेळी करण्यास उत्सुक आहे. संयुक्त अरब अमिरात व वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. विराट कोहलीने (२२९ धावा) सर्वंच सामन्यांत चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामी लढतीत त्याने शतक झळकावले होते. वेस्ट इंडिजविरुद्ध ३३ धावा केल्यानंतर तो चुकीचा फटका खेळून बाद झाला. सुरेश रैना व अजिंक्य रहाणे यांनीही प्रत्येकी एक चांगली खेळी केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत या दोन्ही फलंदाजांना छाप सोडता आली नाही.
भारतीय फलंदाजांना सेडन पार्कवरील कामगिरीत सुधारणा करण्याची संधी आहे. भारताने येथे ८ सामने खेळले आहेत, पण त्यांना केवळ २ सामन्यांत विजय मिळविता आला. या मैदानावर शतकी खेळी करणारा वीरेंद्र सेहवाग एकमेव भारतीय फलंदाज आहे. सेहवागने २००२-०३ च्या मालिकेत हा पराक्रम केला होता.
आयर्लंड संघ बाद फेरी गाठण्यास उत्सुक असून त्यासाठी त्यांच्यापुढे भारत व पाकिस्तान या संघांपैकी एका संघाला पराभूत करण्याचे आव्हान आहे. एड जॉयसने चार सामन्यांत २३३ धावा फटकाविल्या आहेत; तर अँडी बालबर्नीने २१९ धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाज केव्हिन ओब्रायनला आतापर्यंत एकाही लढतीत छाप सोडता आलेली नाही. तशीच परिस्थिती त्याचा भाऊ नील ओब्रायनची आहे. वेगवान गोलंदाज बॉयड रँकिनच्या अनुपस्थितीत आयर्लंड संघाची गोलंदाजी कमकुवत भासत आहे. वेगवान गोलंदाज अॅलेक्स कुसाक व फिरकीपटू जॉर्ज डॉकरेल यांच्या कामगिरीवर आयर्लंड संघाची भिस्त अवलंबून आहे. कागदावर विचार करता खेळाच्या सर्वंच विभागात भारतीय संघ वरचढ भासत आहे. (वृत्तसंस्था)