चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत कोहलीवर विसंबून नाही

By Admin | Updated: May 12, 2017 00:56 IST2017-05-12T00:56:19+5:302017-05-12T00:56:19+5:30

विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे

India does not rely on Kohli in the Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत कोहलीवर विसंबून नाही

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत कोहलीवर विसंबून नाही

नवी दिल्ली : विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे ही बाब निरर्थक ठरत असल्याचे मत विश्वविजेत्या संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये होत असून, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये कोहली चक्क ‘फ्लॉप’ ठरला आहे.
कोहलीच्या फॉर्ममुळे चॅॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारताच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होईल का, असा सवाल करताच कपिल म्हणाले, ‘‘आपण धमरशालामधील आॅस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना पाहिला का? कोहली खेळणार नसेल तर भारत पराभूत होईल, अशी भीती प्रत्येकाने व्यक्त केली होती. पण काय घडले, हे सर्वांना ठाऊक आहे. भारताचे भवितव्य केवळ कोहलीवर विसंबून आहे, असे म्हणण्याचा अर्थ संघातील अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास कमी करणे असा होतो.’’
५८ वर्षांचे कपिल पुढे म्हणाले, ‘‘कोहली संघाचा मोलाचा सदस्य आहे. दिग्गज फलंदाजदेखील आहे. कधी कसे खेळायचे, याची त्याला चांगली जाणीव आहे. भारत ही स्पर्धा जिंकू शकतो; पण स्पर्धेदरम्यान डावपेच कसे कार्यान्वित होतात, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे.’’
दिल्लीचा मॅडम तुसाद संग्रहालयात कपिल यांच्या मेणाच्या पुतळ्याचे त्यांच्याच हस्ते आज अनावरण करण्यात आले. या वेळी कपिल म्हणाले, ‘‘भारताने गेल्या ५ वर्षांत खेळाचा दर्जा उंचावला आहे. संघबांधणी चांगलीच झाली आहे. सामन्याच्या दिवशीच्या कामगिरीवर आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या वृत्तीवर संघाची वाटचाल अवलंबून राहील.’’
एखादा विशेष गोलंदाज विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल का, असे विचारताच ते म्हणाले, ‘‘एखादा नव्हे, तर सर्वच गोलंदाजांची सांघिक भूमिका संघाच्या यशासाठी कारणीभूत ठरेल. आमच्या तुलनेत आजच्या युवा गोलंदाजांमध्ये अधिक जोश आहे. आम्ही परिपक्व होतो, तर आजचे गोलंदाज अधिक व्यावसायिक बनले आहेत. निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंच्या तुलनेत संघ निवडताना अनुभवाला अधिक प्राधान्य दिले आहे.’’
भारताकडे अद्यापही कपिलसारखा अष्टपैलू गोलंदाज नाही. दुसरा कपिल कधी घडू शकतो, असे विचारताच ते म्हणाले, ‘‘हे कठीण काम आहे. माझ्या तुलनेत सरस खेळाडू यावेत, असे मलादेखील वाटते. आश्विन आणि जडेजासारख्या चांगले
युवा अष्टपैलू खेळाडूंची संघाला
गरज आहे.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: India does not rely on Kohli in the Champions Trophy