अर्जेंटिनाकडून भारत ३-० गोलने पराभूत
By Admin | Updated: November 27, 2015 23:49 IST2015-11-27T23:49:48+5:302015-11-27T23:49:48+5:30
स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या

अर्जेंटिनाकडून भारत ३-० गोलने पराभूत
रायपूर : स्टार खेळाडू पेइलेट गोंझालो याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर अर्जेंटिनाने यजमान भारताला ३-०ने सहज नमवित वर्ल्ड हॉकी लीग फायनल स्पर्धेच्या उद््घाटनाचा दिवस गाजविला. रायपूरच्या वल्लभाई पटेल स्टेडियमवर हा सामना झाला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाने सुरूवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व ठेवत भारताला एकही संधी दिली नाही. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरद्वारे मिळालेल्या संधीचे सोने करीत गोंझालोने संघाला १-०अशी आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या २४व्या मिनिटास पेनल्टी कॉर्नरवर जोआक्विन मिनेनी याने गोल करीत आघाडी २-० अशी वाढविली.
दुसरीकडे भारताचा स्टार मिडफिल्डर सरदारसिंह याच्या नेतृत्वाखील उतरलेल्या भारताच्या संघाकडून फारसा प्रतिकारही दिसला नाही. दुसऱ्या हाफमध्ये रमनदीप, रघुनाथ, रुपींदर यांनी अर्जेंटिनावर काहीसा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताचे आक्रमण थोपविण्यात अर्जेंटिनाला यश आले. रुपींदरला ५०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरद्वारे गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र या संधीचे तो गोलमध्ये रुपांतर करु शकला नाही.
अर्जेंटिनाने आपले आक्रमण सुरुच ठेवत चेंडूवर अधिक ताबा ठेवला. सामन्याच्या ६०व्या मिनिटास पेनल्टीकॉर्नरवर गोंझालोने वैयक्तिक दुसरा गोल करीत संघाची आघाडी ३-० अशी भक्कम करीत संघाचा विजय देखिल निश्चित केला.
आता भारताची पुढची लढत शनिवारी जर्मनीशी होईल.