भारताचे द. आफ्रिकेसमोर ३१० धावांचे आव्हान

By Admin | Updated: November 26, 2015 17:00 IST2015-11-26T09:55:41+5:302015-11-26T17:00:00+5:30

दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताची फलंदाजीही ढेपाळली असून भारताने दुस-या डावात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद ३१० धावांचे आव्हान दिले आहे.

Of India Challenge 310 against South Africa | भारताचे द. आफ्रिकेसमोर ३१० धावांचे आव्हान

भारताचे द. आफ्रिकेसमोर ३१० धावांचे आव्हान

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २६ - दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव ७९ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताची फलंदाजीही ढेपाळली असून भारताने दुस-या डावात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद ३१० धावांचे आव्हान दिले आहे. दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर दुस-या डावात २ बाद ३२ धावा केल्या आहेत. 
भारताच्या दुस-या डावात सलामीवर मुरली विजय अवघ्या पाच धावांवर तंबूत परतला तर, सध्या खराब फॉर्मात असलेल्या शिखर धवनने मैदानात जम बसवण्याचा प्रयत्न केला. पण, तोही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. धवनने ३९ धावा केल्या. त्यानंतर इम्रान ताहीरच्या गोलंदाजीवर कोहली(१६) झेलबाद झाला. त्यापाठोपाठ रहाणे(९) देखील तंबूत दाखल झाला. रोहित शर्मा(२३) बाद झाल्यानंतर भारताचा एकापाठोपाठ  विकेट गेल्या आणि भारताला १७६ धावांपर्यंतच मजल मारता आली. आफ्रिकेकडून इम्रान ताहीरने ५ विकेट्स मिळवल्या तर, मॉर्केलने ३ गडी बाद केले.
 भारताकडे पहिल्या डावातली १३६ धावांची आघाडी असल्यामुळे एकूण आघाडी २५४ धावांची आहे. दुस-याच दिवशी ही स्थिती असल्यामुळे कदाचित तिस-या दिवशीच हा सामना संपेल अशी चिन्हे आहेत. जास्तीत जास्त धावा करून द. अफ्रिकेवर मोठी आघाडी घेण्याचे भारताचे मनसुबे असले तरी अफ्रिका ते सहजसाध्य होऊ देत नाहीये.
भारताचे पहिले सहा फलंदाज तंबूत परतले असून मुरली विजय (५), शिखर धवन (३९), चेतेश्वर पुजारा (३१), विराट कोहली (१६), अजिंक्य रहाणे (९) व वृद्धीमान साहा (७) व रवींद्र जाडेजा (५) तंबूत परतले आहेत. रोहीत शर्मा ६ व रवीकिरण अश्विन (०) खेळत आहेत. इम्रान ताहीरने ५ गडी बाद केले आहेत. तर मॉर्केल, ड्युमिनी व हार्मरने प्रत्येकी एक गडी बाद केला आहे.
 
भारतीय फिरकी गोलंदाजांनी अफ्रिकेच्या फलंदाजांची त्रेधातिरपिट उडवली असून अवघ्या ७९ धावांमध्ये अफ्रिकेचा संघ तंबूत धाडला आहे. अफ्रिकेचा भारताविरुद्धचा हा नीचांक आहे. याआधी जोहान्सबर्गमध्ये भारताने अफ्रिकेला २००६ मध्ये ८४ धावांमध्ये गुंडाळले होते. भारताकडे आता पहिल्या डावामध्ये १३६ धावांची आघाडी आहे. दुस-या दिवशी पहिल्याच षटकामध्ये एल्गारला बाद करत अश्विनने दणक्यात सुरुवात केली. त्यानंतर त्यानेच हाशिम आमलाला बाद केले व जाडेजाने ए. बी. डिव्हिलियर्सचा अडथळा दूर केला. पाठोपाठ जाडेजाने ड्युप्लेसिसला व व्हिलासला त्रिफळाचीत केले. तर अश्विनने एक अप्रतिम लेगस्पिन चेंडू टाकत त्रिफळाचीत करत हार्पनरला चकित केले. अमित मिश्राने ड्युमिनीला पायचीत केल्यानंतर अश्विनने मॉर्नी मॉर्केलला स्वत:च्या गोलंदाजीवर झेलबाद करत पाचवा बळी टिपला आणि अफ्रिकेची अवस्था सर्व गडी बाद ७९ अशी केली. अश्विनने पाच बळी टिपले आहेत तर जाडेजाने चार बळी टिपले तर अमित मिश्राने एक बळी टिपला आहे.
फिरकीपटूंसाठी अनुकूल जामठाच्या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ फलंदाजांना माघारी परतवत गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. भारताचा पहिला डाव ७८.२ षटकांत २१५ धावांत संपुष्टात आल्यानंतर प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाची दिवसअखेर २ बाद ११ अशी अवस्था झाली आहे. बुधवारी पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी ७ धावा काढून खेळपट्टीवर असलेल्या डीन एल्गर याला कर्णधार अमला खाते न उघडता साथ देत होता. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर वान जिल (००) पुन्हा एकदा अश्विनचे लक्ष्य ठरला तर नाईट वॉचमन इम्रान ताहिर (४) याला जडेजाने तंबूचा मार्ग दाखवला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर हा कसोटी सामनाही तीन दिवसांत संपण्याचे संकेत मिळत आहेत. फिरकीपटूंना अनुकूल खेळपट्टीवर ‘अश्विन अ‍ॅण्ड कंपनी’ला सामोरे जाण्याचे पाहुण्या संघापुढे आव्हान आहे. या कसोटी मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात पहिल्याच दिवशी पहिला डाव संपुष्टात आला आहे. भारतातर्फे एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिका संघाला भारताची पहिल्या डावातील धावसंख्या गाठण्यासाठी अद्याप २०४ धावांची गरज असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. फिरकीला अनुकूल जामठ्याची खेळपट्टी बघता उद्या, गुरुवारी दक्षिण आफ्रिकन फलंदाजांना घाम फुटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला मुरली विजय व शिखर धवन यांनी सलामीला अर्धशतकी भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. शिखर (१२) पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. एल्गरने शिखरला माघारी परतवत ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर मुरली विजय (४०) मोर्कलचे लक्ष्य ठरल्यामुळे भारताची २ बाद ६९ अशी अवस्था झाली. उपाहाराला खेळ थांबला त्यावेळी भारताने २ बाद ८५ धावांची मजल मारली होती.
 
उपाहारानंतरच्या सत्रात मोर्कलने वेगवान गोलंदाजीचा शानदार नमुना सादर केला. त्याआधी, सुरुवातीला हार्मरने चेतेश्वर पुजाराला (२१) तंबूचा मार्ग दाखवत भारताला तिसरा धक्का दिला. रहाणेने सुरुवातीलाच षटकार ठोकत आक्रमक फलंदाजीचे संकेत दिले, पण मोर्कलने राहणे (१३) व कर्णधार विराट कोहली (२२) यांना दोन षटकांच्या अंतरात माघारी परतवत भारताची ५ बाद ११६ अशी अवस्था केली. संधी मिळालेल्या रोहित शर्माला (२) विशेष चमक दाखवता आली नाही. रोहितला हार्मरने तंबूचा मार्ग दाखवला. उपाहार ते चहापानादरम्यान भारताने २८ षटकांत ६४ धावांच्या मोबदल्यात चार फलंदाज गमावले. उपाहारानंतरच्या खेळात रिव्हर्स स्विंगचा प्रभाव अनुभवाला मिळाला. साहा व जडेजा (३४ धावा, ६ चौकार) यांनी सातव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या. रबादाविरुद्ध आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात जडेजाचा त्रिफळा उडाल्यामुळे ही भागीदारी संपुष्टात आली. साहा व अश्विन यांनी धावफलक हलता ठेवताना संघाला २००चा पल्ला ओलांडून दिला. हार्मरने संयमी फलंदाजी करणाऱ्या साहाला (३२) माघारी परतवत भारताची ८ बाद २०१ अशी अवस्था केली. अश्विन (१५) व मिश्रा (३) यांना अनुक्रमे ताहिर व हार्मर यांनी माघारी परतवत भारताचा डाव गुंडाळला.
 
दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज हार्मरने ७८ धावांच्या मोबदल्याच ४ बळी घेतले. मोर्कल (३-३५), रबाडा (१-३०), एल्गर (१-७) व ताहिर (१-४१) यांनी त्याला योग्य साथ दिली.
 
दरम्यान मोर्कलला स्नायूच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाला आणखी एक धक्का बसला. त्याआधी, भारताने संघात दोन बदल करताना वरुण अ‍ॅरोन व स्टुअर्ट बिन्नी यांच्या स्थानी रोहित शर्मा व अमित मिश्रा यांना संधी दिली.
 
भारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. मोर्केल ४०, शिखर धवन झे. व गो. एल्गर १२, चेतेश्वर पुजारा पायचित गो. हार्मर २१, विराट कोहली झे. विलास गो. मोर्कल २२, अजिंक्य रहाणे त्रि. गो. मोर्कल १३, रोहित शर्मा झे. डिव्हिलियर्स गो. हार्मर ०२, वृद्धिमान साहा, झे. ड्युमिनी गो. हार्मन ३२, रवींद्र जडेजा त्रि. गो. रबादा ३४, रविचंद्रन अश्विन त्रि. गो. ताहिर १५, अमित मिश्रा पायचित गो. हार्मर ०३, ईशांत शर्मा नाबाद ००. अवांतर (२१). एकूण ७८.२ षटकात सर्वबाद २१५. बाद क्रम : १-५०, २-६९, ३-९४, ४-११५, ५-११६, ६-१२५, ७-१७३, ८-२०१, ९-२१५, १०-२१५. गोलंदाजी : मोर्कल १६.१-७-३५-३, रबादा १७-८-३०-१, हार्मर २७.२-२-७८-४, एल्गर ४-०-७-१, ताहिर १२.५-१-४१-१, ड्युमिनी १-०-६-०.
 
 
> गर्दीने लक्ष वेधले !
 
कसोटी सामना म्हटला की प्रेक्षक सहसा मैदानाकडे भटकत नाहीत. पण जामठा मैदानावर बुधवारी दहा हजारावर प्रेक्षकांनी सामन्यासाठी गर्दी केली. कालपर्यंत १७५०० तिकिटे विकली गेल्याची माहिती व्हीसीए प्रशासनाने दिली. पहिल्या दिवसाचा खेळ पाहायला येणारी गर्दी बघितल्यानंतरत्याचा प्रयत्य आला. गुरुनानक जयंतीची शासकीय सुटी असल्याने आबालवृद्ध आणि शाळकरी विद्यार्थ्यांसह संपूर्ण कुटुंबाने सामन्याचा आनंद लुटला. याशिवाय मनपाच्या पन्नालाल देवडिया शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत अन्य शाळांमधील विद्यार्थीदेखील गणवेशात आले होते. भारताने सुरुवातीला फलंदाजी घेतल्याने टाळ्या आणि शिट्या वाजवून तसेच तिरंगा फडकवित अनेकांनी मनमुराद दाद दिली.
 
> खेळाडूंच्या ‘सौ.’
 
पे्रस बॉक्समध्ये !
 
स्थानिक खेळाडू आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या तिन्ही खेळाडूंच्या श्रीमतींनी आज प्रेस बॉक्समध्ये लंच घेतला. सर्वजणी दिवसभर सामन्याचा आनंद लुटण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होत्या. उमेशला सध्या अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळू शकले नाही.
 
> मेक्सिकन वेव्ह !
 
कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे फलंदाजी करीत असताना उपस्थित चाहत्यांनी मेक्सिकन वेव्ह सादर केली. प्रेक्षकांचा उत्साह ओसंडून वाहात असतानाच भारतीय खेळाडू एकापाठोपाठ एक बाद होत गेले. यामुळे मेक्सिकन वेव्ह देखील फार वेळ सादर झाली नाही. नागपुरात सामना असला की मेक्सिकन वेव्ह हमखास दिसते.
 
फोटोसाठी चढाओढ !
 
सामन्याच्या सुरक्षेत व्यस्त असलेले पोलीसही क्रिकेटप्रेमी आहेत. त्यांचेही आवडते खेळाडू आहेतच. अनेक जवानांनी ड्युटीदरम्यान संधी मिळेल तेव्हा आपल्या आवडत्या खेळाडूचे छायाचित्र स्वत:च्या मोबाईलमध्ये साठवून घेण्याची संधी सोडली नाही. उपाहारादरम्यान खेळाडूंच्या ड्रेसिंगरुमजवळ तैनात पुरुष आणि महिला जवानांना फोटो काढून घेण्याचा मोह आवरत नव्हता.
 
> दिवसाचे तिकीट नाही !
 
कसोटी सामन्यातील पाचही दिवसाचे तिकीट खरेदी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. अमूक एका दिवसाचे तिकटी हवे असेल तर ते मिळणार नाही. व्हीसीएने दिलेल्या माहितीनुसार सिझन तिकीट निर्धारित दरात ‘बुक माय शो’ वेबसाईटवर आॅनलाईनवर तसेच व्हीसीएच्या सिव्हिल लाईन्स स्टेडिमयमध्ये उपलब्ध आहे. प्रेक्षकांना जामठा स्टेडियम परिसरात तिकीट उपलब्ध होऊ शकणार नाही.
 
> खोडा, पाटील उपस्थित
 
या सामन्यादरम्यान राष्ट्रीय निवड समिती प्रमुख संदीप पाटील आणि सदस्य गगन खोडा यांनी हजेरी लावली आहे. या सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवरून कुठलीही संघ निवड होणार नसली तरी निवड समितीचे सदस्य येथे दाखल झाले आहेत. याशिवाय समालोचनासाठी आलेले माजी दिग्गज सुनील गावस्कर, संजय मांजरेकर, अनिल कुंबळे,
 
द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज ग्रॅमी पोलाक हे देखील आकर्षण ठरले.
 
> बॅग, बाटल्या अडवल्या!
 
प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देतेवेळी पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या बॅग्स, पाण्याच्या बाटल्या आणि भारतीय तिरंग्यासोबत असलेले पीव्हीसी पाईपचे दंडे आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई केली. बॅग्स दारावर जमा करण्याची सक्ती करण्यात आली होती. सर्वाधिक फटका गुटखा प्रेमींना बसला. अनेकांकडे असलेल्या खर्ऱ्याच्या पुड्या आणि गुटखा दारावरच काढून घेण्यात आल्या.

Web Title: Of India Challenge 310 against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.