भारताचा मलेशियावर विजय
By Admin | Updated: November 16, 2015 02:42 IST2015-11-16T02:42:09+5:302015-11-16T02:42:09+5:30
हरमनप्रितसिंह आणि मनदीपसिंह यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आठव्या ज्युनियर हॉकी आशिया कप स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले

भारताचा मलेशियावर विजय
कुआनतान (मलेशिया) : हरमनप्रितसिंह आणि मनदीपसिंह यांच्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर भारताने आठव्या ज्युनियर हॉकी आशिया कप स्पर्धेत विजयी अभियान कायम ठेवले. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने मलेशियाला ग्रुप एमध्ये ५-४ ने पराभूत केले.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जपानला २-१ ने पराभूत केले होते. मलेशियाविरुद्ध झालेल्या या सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये भारत १-२ असा पिछाडीवर होता. दुसऱ्या हाफमध्ये भारताने जबरदस्त खेळ केला. त्यानंतर भारताने २१ मिनिटांत चार गोल केले आणि यजमान संघासमोर आव्हान निर्माण केले. त्यानंतर हा सामना ५-४ असा जिंकला. या सामन्यात मलेशियाच्या शाहरिल सबाह याने पहिल्या मिनिटात गोल करून आघाडी घेतली. मात्र मनदीप याने दहाव्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली. शाहरिल याने २० मिनिटांत मलेशियाला २-१ आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये चाळीस मिनिटांत गुरजंतसिंह याने मैदानी गोल करून भारताला २- २ अशी बरोबरी साधून दिली. जपानविरोधात दोन गोल करणारा ड्रॅगफ्लिकर हरमनप्रितसिंहने ४६ आणि ५६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल करीत भारताला ४-२ अशी आघाडी मिळवून दिली. मनदीपने ६१ व्या मिनिटाला आपला दुसरा आणि भारताचा पाचवा गोल केला. त्या वेळी ५-२ अशी अवस्था होती. मात्र मलेशियाच्या खेळाडूंनी त्यानंतर पुन्हा जबरदस्त खेळ केला. इस्मत सुफी रोहुल्लामीन याने ६२
व्या आणि शाहरिल याने ६६ व्या मिनिटाला पुन्हा गोल केला. त्या
वेळी ५-४ अशी अवस्था होती. मंगळवारी भारताचा सामना चीनशी होणार आहे. (वृत्तसंस्था)