भारत-बांगलादेश पहिला वन-डे आज
By Admin | Updated: June 15, 2014 03:14 IST2014-06-15T03:14:34+5:302014-06-15T03:14:34+5:30
स्टार खेळाडूंविना दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत रविवारी यजमान बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे

भारत-बांगलादेश पहिला वन-डे आज
मीरपूर : स्टार खेळाडूंविना दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत रविवारी यजमान बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने राखीव खेळाडूंना छाप सोडण्याची संधी मिळाली आहे.
बीसीसीआयने कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासह सात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रॉबिन उथप्पा, मनोज तिवारी, परवेज रसूल आणि अक्षर पटेल यांना प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. धोनी अॅण्ड कंपनीच्या अनुपस्थितीमुळे मालिकेचे वलय कमी झाले आहे. त्याचप्रमाणे फिफा विश्वकप स्पर्धेमुळे प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळणार नसल्याचे चिन्ह आहेत. भारतातील कुठल्याही अव्वल प्रसारक कंपनीने अद्याप थेट प्रसारणाचे हक्क विकत घेतलेले नाहीत, हे विशेष. भारतासाठी ही नव्या आंतरराष्ट्रीय मोसमाची सुरुवात आहे. आयपीएल स्पर्धेनंतर खेळाडूंना दोन आठवड्यांची विश्रांती घेण्याची संधी मिळाली असून आता पुन्हा एकदा ते नव्या मोसमासाठी सज्ज झाले आहेत.
मुरली कार्तिकची निवृत्ती
भारताचा लेफ्टआर्म स्पीनर मुरली कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ३७ वर्षीय कार्तिकने शनिवारी एका पत्रकार परिषदेत आपले संक्षिप्त निवेदन वाचून दाखविले, त्यात त्याने आपण निवृत्त होत असल्याचे म्हंटले आहे. आठ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने भारतासाठी आठ कसोटी, ३७ वनडे आणि एक ट्ेंटी-२0 सामना खेळला आहे. (वृत्तसंस्था)