विजयी ‘ट्रॅक’वर येण्याचे लक्ष्य
By Admin | Updated: December 17, 2014 01:43 IST2014-12-17T01:41:13+5:302014-12-17T01:43:07+5:30
थरारक अॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे.

विजयी ‘ट्रॅक’वर येण्याचे लक्ष्य
ब्रिसबन : भावानिक आणि थरारक अॅडिलेड कसोटीत विजय मिळवून यजमान आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेत ब्रिस्बेनमध्ये दाखल झाला आहे. या कसोटीत दोन्ही संघ विजयासाठी रस्सीखेच करण्यासाठी बाहू सरसावून सज्ज झाले आहेत. मात्र, या कसोटीत आॅस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघाचे नेतृत्व बदलल्याने त्यांच्यातील चुरस आणखीन वाढली आहे. मायकल क्लार्कच्या दुखापतीमुळे तरूण स्टिव्ह स्मिथ याच्याकडे आॅस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे, तर दुखापतीतून सावरल्यामुळे भारताला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी महेंद्रसिंग धोनी तयार आहे. दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ आक्रमक खेळ करतील, असा निर्धार सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांनी व्यक्त केला आहे.
आॅस्ट्रेलियाने अॅडिलेड कसोटीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला या लढतीत ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. मात्र, यशस्वी आणि अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी परतल्यामुळे संघात नवचैतन्य आले आहे आणि मालिकेत कमबॅक करण्याच्या त्यांच्या आशा दुणावल्या आहेत.
आॅस्ट्रेलिया संघ कर्णधारासह काही नव्या बदलांनी सामन्यात उतरणार आहे. आॅसी संघाने दुसऱ्या कसोटीसाठी संघात जोश, हेजलवूड आणि मिशेल स्टार्क यांना स्थान दिले आहे. रियान हॅरिस व पिटर सिडल यांना विश्रांती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त क्लार्कच्या जागी संघात शॉन मार्शचे आगमन झाले आहे.
कर्णधार धोनी याचे विश्रांतीनंतर संघात कमबॅक हे फायद्याचे ठरणार आहे. पहिल्या कसोटीत झालेल्या चुकांचा अभ्यास धोनीने केलाच असावा आणि त्यावर तोडगा काढून तो या दुसऱ्या कसोटीची रणनिती आखेल. या विश्रांतीमुळे धोनीही नव्या दमाने मैदानावर उतरणार असल्याने संघ चांगली कामगिरी करेल, हे निश्चित आहे. पहिल्या कसोटीत फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या चुका सुधारल्यास भारत दुसऱ्या सामन्यात मुसंंडी मारेल हे नक्की आहे.
सलामीवीरांची कामगिरी निराशाजनक झाली आहे. शिखर धवनने निराश केले, तर तळाच्या फलंदाजांनाही फार चमक दाखविता आलेली नाही. विराट कोहलीने चौथ्या क्रमांकावर येताना दोन्ही डावांत शतक ठोकून शाही कमबॅक केले, तर मुरली विजयने दोन डावांत मिळून १५२ धावा चोपल्या. या दोघांना शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्माकडून हवी तशी मदत मिळालेली नाही. गोलंदाजीतही भारताला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. इशांत शर्मा, वरूण अॅरोन, मोहम्मद शमी यांचे अपयश आॅसींच्या पथ्यावर पडले. कर्ण शर्माला प्रभाव पाडण्यात अपयश आले. (वृत्तसंस्था)