गतविजेत्या मुंबईकरांसमोर तामिळनाडूचा ८७ धावांत खुर्दा
By Admin | Updated: October 7, 2016 06:15 IST2016-10-07T06:15:44+5:302016-10-07T06:15:44+5:30
अनुभवी धवल कुलकर्णी आणि रणजी पदार्पण करणारा तुषार देशपांडे या मध्यमगती गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी स्पर्धेच्या आपल्या

गतविजेत्या मुंबईकरांसमोर तामिळनाडूचा ८७ धावांत खुर्दा
रोहतक : अनुभवी धवल कुलकर्णी आणि रणजी पदार्पण करणारा तुषार देशपांडे या मध्यमगती गोलंदाजांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या बलाढ्य मुंबईने रणजी स्पर्धेच्या आपल्या पहिल्या सामन्यात पहिल्याच दिवशी तामिळनाडूला अवघ्या ८७ धावांत गुंडाळले. यानंतर मुंबईची सुरुवातही निराशाजनक झाली. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ४ बाद ८५ अशी मजल मारली. कर्णधार आदित्य तरे २२ तर कौस्तुभ पवार २६ धावांवर नाबाद आहेत.
नाणेफेक जिंकून तरेने गोलंदाजी स्वीकारली. वेगवान गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीचा धवल-तुषार जोडीने पुरेपूर फायदा घेत रणजी स्पर्धेत मुंबईला धमाकेदार सुरुवात करून दिली. तुषारने २५ धावा तर धवलने ३१ धावा देत प्रत्येकी ४ फलंदाजांना तंबूत धाडले. बलविंदर सिंग संधूने (२/१४) देखील या दोघांना चांगली साथ दिली. तामिळनाडूकडून बाबा इंद्रजीत (नाबाद २८), बाबा अपराजित (१६) आणि दिनेश कार्तिक (१५) यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
यानंतर मुंबईने आक्रमक सुरुवात केली, मात्र त्याचा फायदा घेण्यात मुंबईकरांना अपयश आले. अश्विन क्रिस्टने सलामीवीर जय बिस्ताला (७) बाद करून मुंबईला पहिला झटका दिला. अखिल हेरवाडकर (१७), अरमान जाफर (०) व सूर्यकुमार यादव (३) लगेच परतल्याने मुंबईचा डाव ४ बाद ५३ असा घसरला. यानंतर कौस्तुभ पवार (नाबाद २६) व कर्णधार तरे (नाबाद २२) यांनी मुंबईला सावरले. (क्रीडा प्रतिनिधी)