सेमीफायनलआधीच भारताला धक्का, युवराज सिंग विश्वचषकातून बाहेर जाण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2016 21:21 IST2016-03-28T21:21:23+5:302016-03-28T21:21:23+5:30
टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागन केल्यानंतर युवराज सिंग दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे, युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेला संघात स्थान मिळण्याची शक्यता

सेमीफायनलआधीच भारताला धक्का, युवराज सिंग विश्वचषकातून बाहेर जाण्याची शक्यता
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 28 - टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागन केल्यानंतर युवराज सिंग दुखापतीमुळे टी20 वर्ल्डकपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. खराब कामगिरीमुळे बाहेर बसावं लागलेल्या युवराज सिंगने टी20 वर्ल्डकपमध्ये दमदार पुनरागमन केल्याने सगळ्यांच्या त्याच्याकडून आशा उंचावल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरोधात बॅटींग करताना दुखापत झाल्यानंतरही मैदान न सोडल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र याच दुखापतीमुळे युवराज सिंग पुढील वर्ल्ड कप खेळेल की नाही ? याबाबत शंका निर्माण होत आहे. बीबीसीआयने मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
एबीपीन दिलेल्या वृत्तानुसार युवराज सिंगच्या जागी मनीष पांडेला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजमेंटने युवराजला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्या युवराजच्या पायाचे स्नायू दुखावले होते. त्यामुळे युवराज आता विश्वचषकातील उर्वरित सामने खेळू शकणार नाही, हे जवळपास निश्चित झालं असल्याचं कळत आहे.
गेल्यावर्षी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौ-यात पाचव्या वनडेत सेंच्यूरी मारुन मनीष पांडेने आपली छाप पाडली होती. आयपीएलमध्ये सेंच्यूरी मारणा-या पहिला भारतीय खेळाडूचा रेकॉर्डही मनीष पांडेच्या नावावर आहे. 31 मार्चला वानखेडे मैदानावर भारताचा वेस्ट इंडिजसोबत सेमीफायनल सामना होणार आहे.