ऑनलाइन लोकमत
इंदौर, दि. १४ - कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (नाबाद ९२) शानदार खेळीमुळे दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी २४८ धावांचे आव्हान ठेवले आहे. धोनी व अजिंक्य रहाणे (५१) यांच्या खेळीमुळे भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून २४७ धावा केल्या.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणा-या भारताचा भरवशाचा फलंदाज रोहित शर्मा अवघ्या ३ धावांवर बाद झाल्याने भारताला पहिला धक्का बसला आणि त्यानंतर भारताची पडझड सुरूच राहिली. मात्र अजिंक्य रहाणेने ५१ धावांची खेळी करत भारताचा डाव सावरला. मात्र तो बाद झाल्यानंतर पुन्हा डाव कोसळला. भारतीय संघ २०० धावाही करू शकेल की नाही अशी भीती वाटत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाच्या मदतीला धावून आला आणि ९२ धावांची शानदार खेळी करून भारताला २४७ धावांचा टप्पा गाठून दिला.
रोहित शर्मा (३), धवन (२३), कोहली (१२), रैना (०), अक्षर पटेल (१३), भुवनेश्वर कुमार (१४), हभजन सिंग (२२) आणि उमेश यादवने ४ धावा केल्या. तर दक्षिण आफ्रिकेतर्फे स्टेनने ३, मॉर्केल व ताहिरने प्रत्येकी २ आणि रबाडाने १ बळी टिपला.