पदकांबद्दल भाकिते वर्तवण्याची घाई नको!
By Admin | Updated: August 6, 2016 03:43 IST2016-08-06T03:43:19+5:302016-08-06T03:43:19+5:30
आॅलिम्पिकचा उल्लेख येताच माझ्या डोळ्यांसमोर येते ते १९८०चे मॉस्को आॅलिम्पिक. त्या वेळी मी १६ वर्षांची होते.

पदकांबद्दल भाकिते वर्तवण्याची घाई नको!
आॅलिम्पिकचा उल्लेख येताच माझ्या डोळ्यांसमोर येते ते १९८०चे मॉस्को आॅलिम्पिक. त्या वेळी मी १६ वर्षांची होते. धावपटू म्हणून पहिल्यांदा १०० मीटर दौडीत सहभागी झाले होते. त्या वेळी हिटमध्येच बाहेर झाले; पण ही संधी मिळाल्यामुळेच मी पुढे १९८४च्या लॉस एंजलिस आॅलिम्पिकमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकले. सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या फरकाने भारत पहिल्या पदकापासून कसा वंचित राहिला, हे सर्वांना माहीत आहे. १९८८च्या आॅलिम्पिकमध्ये मी आऊट आॅफ फॉर्म होते. त्यानंतरही आॅलिम्पिक पदकाचे माझे स्वप्न कायम आहे. त्यामुळे मी युवा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी ‘उषा स्कूल आॅफ अॅथलेटिक्स’ सुरू केले आहे.
यंदा मोठ्या संख्येने अॅथलिट रिओसाठी पात्र ठरले, याबद्दल मी आनंदी आहे. आता खेळाडूंनी कामगिरी सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे भारतीय अॅथलिट चांगली कामगिरी करू शकतात, हा संदेश जाईल. रिओमध्ये भारताला अॅथलेटिक्सचे पदक मिळेल,ा का, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. माझे उत्तर असे, की अॅथलेटिक्सच नव्हे, तर अन्य कुठल्याही खेळात भारतीयांच्या पदकाबद्दल भाकिते करण्याची घाई नकोच. माझ्यासाठी तर अॅथलिट कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकले किंवा राष्ट्रीय विक्रम सुधारू शकले, तरी मोठी उपलब्धी ठरेल. भारतीय अॅथलेटिक्समध्ये महिला खेळाडूंची भरारी फारच समाधानकारक आहे. रिओमध्ये काही महिला खेळाडू फायनलपर्यंत प्रवास करू शकतात.
ललिता बाबर, सुधासिंग आणि टिंटू लुका या क्रमश: ३,००० मीटर स्टिपलचेस तसेच ८०० मीटरची अंतिम फेरी गाठू शकतील. फायनलच्या दिवशी त्यांची कामगिरी कशी होते, यावर भारताच्या पदकाची आशा अवलंबून असेल. पुरुष तिहेरी उडी, पुरुष व महिला थाळीफेक, चार बाय ४०० मीटर रिले यांमध्ये भारतीय खेळाडू अंतिम फेरीपर्यंत धडक देऊ शकतात. मला रिले संघाकडून राष्ट्रीय विक्रम मोडीत निघण्याची आशा आहे. पायी चालण्याच्या शर्यतीतही लंडनसारखीच कामगिरी रिओत होईल, अशी आशा आहे. माझ्यानंतर शंभर मीटरमध्ये पात्र ठरणारी द्यूतीचंद हिचा उल्लेख होणे क्रमप्राप्त आहे. ती सध्या फॉर्ममध्ये आहे. हिटमध्ये ११.२० पेक्षा कमी वेळ नोंदविण्यात तिला यश आले, तर सेमीफायनलसाठी ती पात्र ठरेल. ही भारताच्या दृष्टीने मोठी उपलब्धी असेल. (टीसीएम)