दिल्लीची खेळपट्टीही नागपूरसारखीच : शास्त्री
By Admin | Updated: November 30, 2015 00:57 IST2015-11-30T00:57:15+5:302015-11-30T00:57:15+5:30
क्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टीही मोहली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे असेल

दिल्लीची खेळपट्टीही नागपूरसारखीच : शास्त्री
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून दिल्लीतील फिरोज शाह कोटला स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यासाठीची खेळपट्टीही मोहली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे असेल, अशी आशा भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केली.
शास्त्री यांनी उभय संघांतील फलंदाजांवर टीका करताना फलंदाजांनी खेळपट्टीनुसार फलंदाजी केली नसल्याचे म्हटले आहे. शास्त्री यांनी सांगितले की, ‘खेळपट्टीमध्ये काहीच वाईट नव्हते. दिल्लीची खेळपट्टीही मोहाली व नागपूर येथील खेळपट्ट्यांप्रमाणे राहील, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्येही फलंदाज वन-डेप्रमाणे फलंदाजी करीत आहेत. फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक वेळ घालविणे आवश्यक आहे. अमला व ड्यूप्लेसिस तिसऱ्या दिवशी ज्याप्रमाणे फलंदाजी करीत होते ते बघितल्यानंतर खेळपट्टीमध्ये काहीच दोष नसल्याचे स्पष्ट झाले.’ शास्त्री पुढे म्हणाले, ‘माझ्या मते फलंदाजांनी खेळपट्टीचे स्वरूप ओळखत खेळ केला असता तर त्यांना ८०, ९० एवढेच नाही तर शतकही ठोकता आले असते.’
दरम्यान, नागपूर कसोटी सामन्यात असमतोल उसळीमुळे खेळपट्टीबाबत चर्चा झाली, हे वक्तव्य मात्र त्यांनी फेटाळून लावले. नागपूरच्या खेळपट्टीवर असमतोल उसळी नव्हती. येथे सामन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चेंडू खाली राहण्यास सुरुवात झाली होती. तीन दिवसांमध्ये कसोटी सामने संपत असल्यामुळे शास्त्री यांना चिंता सतावत नाही. शास्त्री म्हणाले,’केवळ भारतातच नाही तर आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यादरम्यान अॅडिलेडमध्येही असेच बघायला मिळाले. तेथेही एकाच दिवशी बरेच फलंदाज बाद झाले. तीन दिवसांमध्ये सामना संपणे चुकीचे नाही.’
भारत कधीच विदेशातील खेळपट्ट्यांवर आपली तुलना करीत नाही, या विराट व अश्विन यांच्या मताचे शास्त्री यांनी समर्थन केले. (वृत्तसंस्था)
अश्विनमध्ये भेदकता येत आहे : अरुण
नागपूर : भारतीय संघाचे गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांनी आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनची प्रशंसा केली. अरुण म्हणाले, ‘त्याची गोलंदाजी मालिकेगणिक सुधारत आहे. अश्विनच्या गोलंदाजीमध्ये विशेष बदल झालेला नाही, पण तो आपली क्षमता ओळखण्यात यशस्वी ठरत आहे. सामना जिंकण्यासाठी कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, याची त्याला कल्पना आलेली आहे. तो नेहमीच एक चांगला गोलंदाज ठरला आहे, पण सामन्यागणिक त्याचा दर्जा उंचावत आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये झपाट्याने सुधारणा होत आहे. सध्याच्या कालावधीत अश्विन सर्वोत्तम आॅफ स्पिनरपैकी एक आहे.