दिवसाखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २२१
By Admin | Updated: December 18, 2014 13:50 IST2014-12-18T09:04:58+5:302014-12-18T13:50:55+5:30
भारताच्या ४०८ धावांचा पाठलाग करताना दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून २२१ धावा केल्या आहेत.

दिवसाखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २२१
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १८ - भारताच्या ४०८ धावांचा पाठलाग करताना दुस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून २२१ धावा केल्या आहेत. अंधुक प्रकाशामुळे दुस-या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला असून स्टीव्ह स्मिथ (६५) व मायकेल मार्श (७ ) खेळत आहेत.
पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शानदार शतके झळकावणा-या डेव्हिड वॉर्नरला दुस-या कसोटीत मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही. २९ धावांवर खेळत असताना तो यादवच्या चेंडूवर बाद झाला तर ख्रिस रॉॉर्स ५५ आणि वॉटसन २५ व शॉन मार्श ३२ धावांवर बाद झाले. भारतातर्फे यादवने ३ तर अश्विनने १ बळी टिपला.
तत्पूर्वी जोश हेजलवूडच्या तेजतर्रार मा-यामुळे भारताचा पहिला डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला. दमदार सुरुवातीनंतरही दुस-या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारताला भक्कम आघाडी घेण्यात फारसे यश आले नाही.
ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवस अखेर मुरली विजयच्या १४४ धावा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद ७१ धावांच्या खेळीने भारताने ४ गडी गमावत ३११ धावा केल्या होत्या. दुस-या दिवशी भारत धावांचा डोंगर उभारुन ऑस्ट्रेलियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल अशी आशा होती. मात्र जोश हेजलवुडचा अचूक मारा, बाऊन्सरचा वापर आणि स्विंगमुळे भारताच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. दुस-या दिवसाला सुरुवात होताच हेजलवूडने अजिंक्य रहाणेला ८१ धावांवर बाद करत सर्वात मोठा अडसर दूर केला. त्यापाठोपाठ वॉटसनने रोहित शर्माला ३२ धावांवर बाद केले. महेंद्रसिंह धोनी आणि आऱ. अश्विनने ५२ धावांची भागीदारी केली. मात्र हेजलवूडने या दोघांचाही अडसर दूर केला. यानंतर तळाचे फलंदाजही झटपट तंबूत परतले आणि भारताचा पहिला डाव ४०८ धावांवर संपुष्टात आला.