क्रिकेट, हॉकी खेळण्याची इच्छा
By Admin | Updated: May 29, 2014 04:32 IST2014-05-29T04:32:09+5:302014-05-29T04:32:09+5:30
भारतात नवे सरकार स्थापन झाल्याबरोबर पाकिस्तानमध्ये उभय देशातील राजकीय तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा संबंध पूर्ववत होण्याविषयी आशावाद निर्माण झाला आहे.

क्रिकेट, हॉकी खेळण्याची इच्छा
कराची : भारतात नवे सरकार स्थापन झाल्याबरोबर पाकिस्तानमध्ये उभय देशातील राजकीय तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा संबंध पूर्ववत होण्याविषयी आशावाद निर्माण झाला आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिलेल्या भेटीमुळे क्रिकेट आणि हॉकी संबंध सुधारतील, असे पाकच्या खेळाडूंना वाटते. शोएब अख्तर म्हणाला, ‘क्रिकेटने नेहमी उभय देशांना जवळ आणण्यात मोलाची भूमिका बजावली. आमच्या पंतप्रधानांनी भारत भेटीत क्रिकेट संबंध पूर्ववत करण्यावर भर दिला असेल अशी मला आशा आहे. भारत- पाक द्विपक्षीय मालिका झाल्यास पाकला आर्थिक लाभ होईल. पीसीबीला आर्थिक मदतीची फार गरज असल्याने भारतासोबत क्रिकेट मालिकेचे आयोजन शक्य तितक्या लवकर व्हायला हवे. याशिवाय आमच्या खेळाडूंना देखील आयपीएल खेळण्यासाठी भारत सरकार परवानगी बहाल करेल.’ अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी म्हणाला, ‘भारताने सकारात्मकदृष्ट्या पाक क्रिकेट संघाला परवानगी द्यावी. बीसीसीआय आणि पीसीबी यांना एकत्र आणून द्विपक्षीय मालिका घडवून आणावी, असे माझ्यासारख्या खेळाडूंना वाटते.’ पाकचा माजी कर्णधार युनूस खान याने देखील भारत-पाक द्विपक्षीय मालिकेचे समर्थन केले. लाहोर येथे पत्रकारांशी बोलताना तो म्हणाला, ‘आमचे पंतप्रधान स्वत: क्रिकेटचे दर्दी असल्यामुळे क्रिकेट मालिका सुरू करण्यासाठी ते पुढाकार घेतील.’ पाकचा माजी गोलंदाज सर्फराज नवाझ म्हणाला, ‘पंतप्रधानांचा भारत दौरा ही चांगली सुरुवात असल्याने यामुळे क्रिकेटचे हित साधले जाईल. माजी कर्णधार वसीम अक्रम आणि आॅफ स्पिनर सईद अन्वर म्हणाले,‘ पाकच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायला मिळावे. याशिवाय उभय देशांत द्विपक्षीय मालिका लवकर सुरू होईल, अशी आशा बाळगतो.’ (वृत्तसंस्था)