मिश्र टीमची चमकदार कामगिरी

By Admin | Updated: February 28, 2017 03:52 IST2017-02-28T03:52:55+5:302017-02-28T03:52:55+5:30

दोन निराशाजनक दिवसांनंतर भारतासाठी विश्वकप नेमबाजीमध्ये आजचा दिवस आनंदाचा ठरला

Brilliant performance of the mixed team | मिश्र टीमची चमकदार कामगिरी

मिश्र टीमची चमकदार कामगिरी


नवी दिल्ली : दोन निराशाजनक दिवसांनंतर भारतासाठी विश्वकप नेमबाजीमध्ये आजचा दिवस आनंदाचा ठरला. अंकुर मित्तलने सोमवारी आयएसएसएफ विश्वकप स्पर्धेत मॅरेथॉन डबल ट्रॅप फायनलमध्ये रौप्यपदक पटकावले. त्याआधी जीतू राय व हीना सिद्धू यांनी १० मीटर मिश्र सांघिक एअर पिस्तूल स्पर्धेत जेतेपद पटकावले.
२४ वर्षीय मित्तल पोडियममध्ये दुसऱ्या स्थानी राहिला. सुवर्णपदकविजेता आॅस्ट्रेलियाच्या जेम्स विलेटच्या तुलनेत तो एका गुणाने पिछाडीवर होता. मित्तलच्या खात्यावर ७४ गुणांची नोंद होती. ग्रेट ब्रिटनच्या स्टीव्हन स्कॉटला ५६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. संग्राम दहिया अव्वल सहामध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला; पण फायनलमध्ये त्याला केवळ २४ गुणांची कमाई करता आली. नव्या नियमानुसार ५० शॉटची डबल ट्रॅप स्पर्धा आता ८० शॉटची करण्यात आली आहे. त्यामुळे सहा नेमबाजांच्या फायनलमध्ये ३० शॉटनंतर एलिमिनेशन सुरू होते.
१५ वर्षीय शपथ भारद्वाजला सिनियर संघासह पहिल्या विश्वकपमध्ये कटमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. त्याने १३७ गुणांची नोंद केली. पात्रता फेरीत तो १३२ गुणांसह दहाव्या स्थानी होता.
शॉटगन प्रशिक्षक मार्सेलो दाद्री यांनी भारद्वाजची कामगिरी दिवसातील सर्वोत्तम कामगिरी असल्याचे म्हटले, तर मित्तलला विलेटच्या साथीने या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम नेमबाज असल्याचे संबोधले. शॉटसर्किटमुळे विद्युतप्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे मिश्र दुहेरीची स्पर्धा एक तास विलंबाने सुरू झाली. त्यात जीतू व हीना यांनी १० मीटर मिश्र सांघिक एअर पिस्तूल स्पर्धेत विजय मिळवला. दरम्यान, मिश्र स्पर्धेचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यात पदक देण्यात
आले नाही. आयएसएसएफच्या कार्यकारी समितीने या स्पर्धेचा समावेश करण्याची शिफारस मंजूर केली आहे. (वृत्तसंस्था)
।अखेरच्या टप्प्यात होते दडपण
आशियाई चॅम्पियन मित्तल सुवर्णपदकाच्या शर्यतीत होता; पण अंतिम टप्प्यात सलग तीन शॉट हुकल्यामुळे त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आॅस्ट्रेलियन नेमबाजाचा अंतिम टप्प्यात केवळ एक नेम चुकला. त्याने अव्वल स्थान पटकावले.
मित्तल म्हणाला,‘या नियमानुसार ही पहिलीच स्पर्धा आहे. कामगिरी चांगली झाली. डबल ट्रॅप स्पर्धेला वगळण्याची शक्यता असल्यामुळे वाईट वाटते; पण किमान पुढील वर्षी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत याचा समावेश राहणार आहे. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे. या स्पर्धेचा मिश्र ट्रॅप स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा विशेष यशस्वी ठरल्याचे चित्र नाही. त्यामुळे काय निर्णय होतो, याबाबत उत्सुकता आहे.’
मित्तल पुढे म्हणाला, ‘अखेरच्या टप्प्यात माझ्यावर दडपण आले होते. त्यामुळे तीन शॉट हुकले. मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे.’
या स्पर्धेत ताळमेळ राखणे महत्त्वाचे ठरते. रायने हीनाच्या साथीने जपानच्या युकारी कोनिशी व तोमोयुकी मातसुदा यांचा ५-३ ने पराभव केला. स्लोव्हेनियाच्या नाफास्वान यांगपाईबून व केव्हिन वेंटा यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राय व हीना उपांत्य फेरीत पिछाडीवर होते; पण त्यांनी त्यानंतर चमकदार कामगिरी करीत सुवर्णपदकाच्या शर्यतीत स्थान मिळवले.
जागतिक क्रमवारीत माजी नंबर वन हीना स्पर्धेनंतर म्हणाली, ‘आनंद झाला. स्पर्धा रंगतदार होती.’ जीतू म्हणाला, ‘यात ताळमेळ राखणे महत्त्वाचे ठरते. सध्या यात अडचण भासत आहे. एकदा नियम स्पष्ट झाल्यानंतर खेळाडूंसाठी चांगले होईल.’
भारताच्या तेजस्विनी सावंतला महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०२.४ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. विश्वकपमध्ये मिश्र स्पर्धेला शनिवारी १० मीटर एअर रायफल नेमबाजीपासून प्रारंभ झाला. त्यात चीनने जपानला पिछाडीवर सोडताना सुवर्णपदक पटकावले.
अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखालील आयएसएसएफ अ‍ॅथलिट समितीने मिश्र स्पर्धेचा समावेश करण्याची शिफारस केली होती आणि विश्व संचालन संस्थेने या प्रस्तावाचा ताबडतोब स्वीकार केला होता.

Web Title: Brilliant performance of the mixed team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.