कराची : अथक प्रयत्न करूनही भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका जुळून येण्याची शक्यता नसल्याचा राग पाकिस्तानने भारतात होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेवर काढला असून, पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या (सॅफ) स्पर्धेतून त्यांनी माघार घेतली आहे. ‘सॅफ’चे महासचिव अनवरूल हक हेलाल म्हणाले, मला पाकिस्तान फुटबॉल संघाकडून (पीएफएफ) एक मेल प्राप्त झाला. त्यात त्यांनी स्पर्धेतून संघ माघार घेत असल्याचे म्हटले आहे. मात्र, माघारीचे कोणतेही कारण त्यात देण्यात आलेले नाही. पुढील महिन्यात २३ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान तिरुवअनंतपूरम येथे ही स्पर्धा होत आहे. त्यात भारत व पाकिस्तान संघ ‘अ’ गटात होते. त्याचबरोबर या गटातच नेपाळ व श्रीलंकादेखील आहेत. ‘ग्रुप-बी’मध्ये मालदीव, भूतान, बांगलादेश व अफगाणिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राच्या मते, पाकिस्तान फुटबॉल संघटनेत सत्तासंघर्ष सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धेतून माघार घेण्यात आली आहे. या गटबाजीवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. न्यायालयाने संघटनेच्या सर्व प्रक्रियेलाच स्थगिती दिल्याने संघटनेला हा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानचा कर्णधार कलीमुल्लाह याने मात्र या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे. पाकिस्तान फुटबॉल संघटनाच फुटबॉलला गांभीर्याने घेत नाही. संघटनेच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कृतीची लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
पाकिस्तान फुटबॉल संघाचा भारतातील स्पर्धेवर बहिष्कार
By admin | Updated: November 24, 2015 00:14 IST