तळाच्या फलंदाजांनी भारताला तंगवले, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ५०५
By Admin | Updated: December 19, 2014 11:26 IST2014-12-19T11:07:28+5:302014-12-19T11:26:53+5:30
ब्रिस्बेन कसोटीत कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक आणि मिचेल जॉन्सन व मिचेल स्टार्क या तळाच्या फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १० गडी गमावत ५०५ धावांचा डोंगर रचला आहे.

तळाच्या फलंदाजांनी भारताला तंगवले, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ५०५
ऑनलाइन लोकमत
ब्रिस्बेन, दि. १९ - ब्रिस्बेन कसोटीत कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक आणि मिचेल जॉन्सन व मिचेल स्टार्क या तळाच्या फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १० गडी गमावत ५०५ धावांचा डोंगर रचला आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९७ धावांची आघाडी घेतली असून दुस-या डावात भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तिस-या दिवशी ४ बाद २११ धावांवरुन पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी कर्णधार स्वीव्हन स्मिथला मोलाची साथ देत संघाला सामन्यावर पकड मिळवून दिली. मिचेल मार्श ११ आणि ब्रॅड हॅडिन सहा धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था सहा बाद २४७ अशी झाली होती. मात्र यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मिचेल जॉन्सनने कर्णधार स्टीव्हन स्मिथला मोलाची साथ दिली. स्टीव्हन स्मिथने दमदार १३३ धावांची खेळी केली. तर मिचेल जॉन्सनने तडाखेबाज खेळी करत ८८ धावा केल्या. या जोडीने १४८ धावांची भागीदारी करत संघाला चारशेपर्यंत पोहोचवले.जॉन्सन बाद झाल्यावर मिचेल स्टार्क ५२ धावा आणि नॅथन लिओनने २३ धावा करुन कर्णधारासोबत किल्ला लढवत संघाला ५०५ धावांचा पल्ला गाठून दिला. भारतातर्फे उमेश यादव आणि इशांत शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर वरुण अॅरोन आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९७ धावांची आघाडी घेत भारतावर दबाव आणला आहे. आता भारतीय फलंदाजांचा या दबावाखाली खेळताना कस लागेल ऐवढे मात्र नक्की.