आजपासून रंगणार ‘भारत श्री’ची चुरस
By Admin | Updated: March 2, 2017 04:53 IST2017-03-02T04:53:40+5:302017-03-02T04:53:40+5:30
यंदाही देशभरातील स्पर्धकांमध्ये किताब पटकावण्यासाठी चुरस रंगणार आहे

आजपासून रंगणार ‘भारत श्री’ची चुरस
मुंबई : प्रतिष्ठेच्या भारत श्री स्पर्धेचा थरार २ ते ४ मार्चदरम्यान गुरगाव येथे पार पडणार असून गतवर्षी रोह्यात (रायगड) झालेल्या स्पर्धेप्रमाणे यंदाही देशभरातील स्पर्धकांमध्ये किताब पटकावण्यासाठी चुरस रंगणार आहे. महाराष्ट्राचे ११ शरीरसौष्ठपटू ‘भारत श्री’ किताब पटकावण्यासाठी आव्हान निर्माण करतील. त्याचवेळी, मुंबईकर सुनीत जाधवपुढे आपले विजेतेपद कायम राखण्याचे विशेष आव्हान असेल.
या तीनदिवसीय स्पर्धेसाठी गुरगाव सेक्टर २९ मध्ये लेझर व्हॅली मैदानात आकर्षक रंगमंचाची उभारणी करण्यात आली आहे. नुकताच झालेल्या मुंबई श्री, महाराष्ट्र श्री स्पर्धेनंतर राज्यातील शरीरसौष्ठवपटूंच्या नजरा ‘भारत श्री’ कडे वळल्या आहेत. गतविजेता सुनीतसमोर जेतेपद राखण्याचे आव्हान आहे. शिवाय सकिंदर सिंग, सागर कातुर्डे, प्रतिक पांचाळ, महेंद्र चव्हाण, सुशांत रांजणकर, अतुल आंब्रे या शरीरसौष्ठवपटूंवरही महाराष्ट्राची मदार असेल.
महाराष्ट्रासमोर रेल्वेच्या किरण पाटील, रामनिवास, राहुल बिश्त यांची कडवी झुंज असून सेनादलाच्या महेश्वरन, पी. कृष्णा यांचे तगडे आव्हान असणार आहे.
त्याचबरोबर उत्तर प्रदेश, हरयाणा, आसाम, केरळ, कर्नाटक येथील खेळाडूंच्या सहभागामुळे विजेतेपदासाठी चुरस निर्माण होईल. (क्रीडा प्रतिनिधी)
>सुनीतसाठी कडवे आव्हान
सुनीत जाधवसमोर विजयश्री कायम राखण्याचे आव्हान आहे. दोन वर्षे शरिरसौष्ठवपासून दूर राहिल्यानंतर दमदार पुनरागमन करत ‘मुंबई श्री’ पटकावणाऱ्या अतुल आंब्रेच्यावर सर्वांचे लक्ष राहणार आहे. शिवाय सकिंदर सिंग, सागर कातुर्डे, प्रतिक पांचाळ, महेंद्र चव्हाण, सुशांत रांजणकर हे देखील सुनीतपुढे तगडी स्पर्धा निर्माण करतील.
यंदा बक्षिस रकमेत ५ लाखांनी वाढ करण्यात आली आहे. यंदा एकूण ४० लाखांची बक्षीसे असून ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ला ५ लाखांचा पुरस्कार दिला जाईल. तसेच उपविजेत्याला ३ लाखांचे आणि तिसऱ्या क्रमांकालाही एक लाखांचे पुरस्कार मिळतील.
>महाराष्ट्र नक्की बाजी मारणार...
महाराष्ट्रापुढे रेल्वे, सेनादलासह यजमान दिल्लीचे तगडे आव्हान आहे. यजमानांच्या हिजबूलने नुकताच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण मिळवले. स्पर्धेत सध्या रेल्वेचे वर्चस्व आहे. महाराष्ट्राकडून सुनीतसह सागर आणि अन्य खेळाडू कामगिरी उंचावतील यात शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्र ‘टीम चॅम्पियनशीप’सह परतेल अशी आशा आहे.
- चेतन पाठारे, भारतीय शरीरसौष्ठव महासंघ,
जनरल सेक्रेटरी.