बीसीसीआय अधिकारी द्विधा मनस्थितीत
By Admin | Updated: December 6, 2015 23:30 IST2015-12-06T23:30:17+5:302015-12-06T23:30:17+5:30
बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी एप्रिल २०१४ मध्ये पीसीबीला लिहिलेल्या पत्रामुळे बोर्ड अडचणीत आले आहे.

बीसीसीआय अधिकारी द्विधा मनस्थितीत
नवी दिल्ली : बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी एप्रिल २०१४ मध्ये पीसीबीला लिहिलेल्या पत्रामुळे बोर्ड अडचणीत आले आहे. या पत्रामुळे भारतीय
संघ पाकिस्तानसोबत खेळण्यास प्रतिबद्ध आहे. त्यामुळे बीसीसीआयचे विद्यमान अधिकारी दुविधेत
अडकले आहेत.
या पत्रानुसार बीसीसीआयने डिसेंबर २०१५मध्ये यूएई किंवा अन्य स्थळावर पाकिस्तानसोबत दोन कसोटी, पाच एकदिवसीय सामने आणि दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास प्रतिबद्धता दर्शवली आहे. ९ एप्रिलला लिहिलेल्या या पत्रात बीसीसीआयने आयसीसीच्या कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत झालेल्या नवीन वित्तीय मॉडेल आणि आयसीसीच्या नियमांनुसार सामने खेळण्यास प्रतिबद्धता दर्शवली होती.
आयसीसीच्या संचलनाच्या नियमानुसार श्रीनिवासन यांना वैश्विक संस्थेचे अध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी पीसीबीसह आशियाई देशांच्या समर्थनाची गरज होती.
बीसीसीआयचे तत्कालीन सचिव संजय पटेल यांनी तेव्हा पीसीबीचे तत्कालीन अध्यक्ष नजम सेठी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय दौऱ्यांबाबत चर्चा आणि बैठकीनुसार बीसीसीआय आणि पीसीबी भारत-पाकिस्तान मालिकेबाबत सहमत आहे. निर्धारित करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार ही मालिका घेण्यात येईल, असेही या पत्रात म्हटले होते.
भारत-पाक मालिकेवरून त्या वेळी बीसीसीआयने म्हटले होते की, संभावित तारखांच्या उपलब्धतेनुसार नोव्हेंबर २०१४ मध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात पाकिस्तानच्या संक्षिप्त दौऱ्यांसाठी प्रयत्न केले जातील. ही तारीख उलटून गेलेली असल्याने बीसीसीआय आणि केंद्र सरकारला दुविधेत अडकवले आहे. बीसीसीआय जर हा करार पूर्ण करत नाही, तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. हा दौरा दोन्ही देशांसाठी बंधनकारक आहे.
दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या संबंधात निर्माण झालेल्या दुराव्यामुळे सरकारला या मालिकेसाठी परवानगी देण्यावर अडचण आहे.
सरकारचे मत जाणून घेण्यासाठी बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. सरकार निर्णय घेण्याआधी सर्व पर्यायांचा विचार करत आहे. विदेशमंत्री सुषमा स्वराज या पुढच्या आठवड्यात पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे.