बीसीसीआयने घटना बदलावी
By Admin | Updated: May 4, 2016 04:04 IST2016-05-04T04:04:47+5:302016-05-04T04:04:47+5:30
बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे

बीसीसीआयने घटना बदलावी
नवी दिल्ली : बीसीसीआयची सध्याची घटना पारदर्शी, निष्पक्ष आणि जबाबदार नसल्यामुळे या तिन्ही गोष्टी अंगीकारण्यासाठी घटनाबदल करावा. घटनाबदल करण्यास बीसीसीआय स्वत: सक्षम आहे. घटनेत बदल केल्यानंतरच उपरोक्त तिन्ही उद्दिष्टे साध्य होऊ शकतात, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
मुख्य न्यायमूर्ती तीरथसिंह ठाकूर आणि न्या. एफ. एम. कलिफुल्ला यांच्या पीठाने हे निरीक्षण नोंदविताना ‘बीसीसीआयचे सध्याचे संविधान पारदर्शीपणा, निष्पक्षपणा आणि जबाबदारीची जाणीव ही तिन्ही मूल्ये राबविण्यात अपयशी ठरले असून, सध्याच्या घटनेत बदल करण्याशिवाय तिन्ही गोष्टींचा स्वीकार शक्य नाही,’ असे नमूद केले.
पीठाने न्यायालय मित्र नेमलेले ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांनी क्रिकेट बोर्ड सार्वजनिक काम करीत असल्याने बोर्डाने ही तिन्ही मूल्ये राबवायला हवीत; ती राबविण्यात अपयशी ठरलेल्या बीसीसीआयला अवैध ठरविण्यात यावे, असे मत व्यक्त करतानाच पीठाने हे निरीक्षण नोंदविले. पीठाचे मत असे, की तुम्ही (बीसीसीआय) सार्वजनिक काम करता; मात्र खासगी दर्जादेखील कायम ठेवू इच्छिता. तुमचे काम सार्वजनिक असेल, तर खासगी दर्जा गमवावा लागेल. देशासाठी राष्ट्रीय संघ निवडणारे बोर्ड खासगी संस्था असूच शकत नाही. तुमचा हा सार्वजनिक उपक्रम आहे.’
पायाभूत बदलाच्या शिफारशींचे समर्थन करीत सुब्रमण्यम यांनी बीसीसीआयने सर्वाजनिक हित जोपासले असते, तर या शिफारशींची गरजही भासली नसती, असे कोर्टापुढे सांगितले. संस्थेचे पावित्र्य कायम राखण्यासाठी संवैधानिक मूल्ये स्वीकारावीच लागतील. न्या. लोढा समितीच्या शिफारशी तुमच्या हिताच्याच आहेत. या शिफारशी लागू केल्यास बीसीसीआयची विश्वासार्हता वाढणार आहे.
पीठाने सुब्रमण्यम यांना प्रश्न विचारला, की तुम्ही दोन्ही टोके एकत्र कशी आणू शकता? कारण ज्या राज्यांना आधी मतदानाच अधिकार होता, त्यांचा अधिकार जाणार
आणि ज्यांना नव्हता त्यांना मिळणार. यावर सुब्रमण्यम म्हणाले, ‘‘प्रत्येक राज्याला बरोबरीची संधी मिळायला हवी. आयपीएलच्या संचालन परिषदेत आणखी पारदर्शीपणा आणण्यासाठी संघांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात यावे.’’
सट्टेबाजीला कायदेशीर वैधता देण्याचे सुब्रमण्यम यांनी समर्थन केले आहे. यावर पीठाने बीसीसीआयकडून उत्तर मागितले. बोर्डाकडून युक्तिवाद करणारे अॅड. के. के. वेणुगोपाल म्हणाले, ‘‘सट्टेबाजी वैध करण्यासाठी कायदा पारित करावा लागेल. बीसीसीआय याच्याशी सहमत
नाही. सट्टेबाजीसंदर्भात
प्रत्येक राज्याचा वेगळा कायदा
आहे. व्यावहारिकदृष्ट्या हे काम अडचणीचे आहे.’’ (वृत्तसंस्था)