आॅस्ट्रेलिया-भारत फायनल व्हावी : ड्वेयर
By Admin | Updated: July 21, 2014 01:58 IST2014-07-21T01:58:42+5:302014-07-21T01:58:42+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि आॅस्ट्रेलिया हे हॉकी संघ फायनलमध्ये आमने सामने यावे अशी इच्छा आॅस्ट्रेलियाच्या दिग्गज हॉकीपटू जेमी ड्वेयर याने व्यक्त केली

आॅस्ट्रेलिया-भारत फायनल व्हावी : ड्वेयर
नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारत आणि आॅस्ट्रेलिया हे हॉकी संघ फायनलमध्ये आमने सामने यावे अशी इच्छा आॅस्ट्रेलियाच्या दिग्गज हॉकीपटू जेमी ड्वेयर याने व्यक्त केली आहे़ मात्र यासाठी भारतीय संघाला प्रतिस्पर्धी संघाचे आव्हान यशस्वीरीत्या पेलावे लागेल, असेही त्याने म्हटले आहे़
ड्वेयर म्हणाला, भारतीय संघ भारतात आयोजित हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करतो यात शंका नाही़ या संघात देशाबाहेरही उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता आहे़ राष्ट्रकुल स्पर्धेत या संघाला फायनलपर्यंत मजल मारायची असेल तर त्यांना आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करणे गरजेचे आहे़
आॅस्ट्रेलियाला या स्पर्धेच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे हे सत्य आहे़ भारतीय खेळाडंूनी उत्कृष्ट सांघिक खेळ केल्यास हा संघही फायनलमध्ये पोहोचू शकतो़ विशेष म्हणजे २०१० मधील राष्ट्रकुल स्पर्धेच्या तुलनेत आताचा भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे, असेही मत ड्वेयर याने म्हटले आहे़ २०१० च्या राष्ट्रकुलच्या फायनलमध्ये आॅस्ट्रेलिया आणि भारतीय हॉकी संघ आमने सामने आले होते़ या लढतीत आॅस्ट्रेलियाने भारताचा ८-० असा धुव्वा उडविला होता़ (वृत्तसंस्था)