डे-नाईट कसोटीला प्रेक्षकांची पसंती
By Admin | Updated: November 30, 2015 00:53 IST2015-11-30T00:53:43+5:302015-11-30T00:53:43+5:30
मला डे-नाईट कसोटीची संकल्पना आवडली. गुलाबी चेंडूचा वापर करण्याचा विचारही योग्य आहे. ही कल्पना साकारणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी प्रशंसा करण्यास उत्सुक आहे.

डे-नाईट कसोटीला प्रेक्षकांची पसंती
मला डे-नाईट कसोटीची संकल्पना आवडली. गुलाबी चेंडूचा वापर करण्याचा विचारही योग्य आहे. ही कल्पना साकारणाऱ्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी प्रशंसा करण्यास उत्सुक आहे. गुलाबी चेंडू आपला आकार कायम राखू शकतो का? गुलाबी चेंडू उपखंडात किती यशस्वी ठरतो हे बघावे लागेल. डे-नाईट कसोटीचे टीकाकारही असतील; पण कॅरी पॅकर्सचा विचार ज्यावेळी आला त्यावेळीही त्यावर टीका करणारे बरेच लोक होते. पण, त्यानंतर वन-डे सोबत काय घडले, हे तुम्ही अनुभवले आहेच. डे-नाईट कसोटीची संकल्पनाही त्याच्या दिशेने वाटचाल करू शकते.
आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि काहीअंशी न्यूझीलंडचा अपवाद वगळला तर बरेच कमी चाहते कसोटी क्रिकेट बघण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतात. डे-नाईट कसोटीमध्ये चाहत्यांना पुन्हा या खेळाकडे आकर्षित करण्याची क्षमता आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हळूहळू बदल करायला पाहिजे, असा माझा सल्ला आहे. गुलाबी चेंडूचा वापर नवी संकल्पना आहे. हा चेंडू योग्य पद्धतीने कार्य करतो किंवा नाही, हे बघावे लागेल. त्यानंतरच कसोटी क्रिकेटमध्ये याचा वापर करता येईल. गुलाबी चेंडू दोन्ही बाजूला स्विंग होतो. या चेंडूला उसळीही चांगली मिळते आणि सीमही आहे. कसोटी रंगीत कपड्यामध्ये खेळण्याची चर्चा करणे सध्या घाईचे ठरेल; पण सध्या गुलाबी चेंडू कसोटी क्रिकेटमध्ये मोठे पाऊल ठरले आहे.
कल्पना करा की, ईडन गार्डन्समध्ये भारत-पाकिस्तान संघांदरम्यान डे-नाईट कसोटी सामना खेळला जात आहे. या लढतीसाठी स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले राहील, यासाठी मी शर्यत लावायला तयार आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात खेळ दुपारी तीन वाजता प्रारंभ होईल आणि जवळजवळ १० वाजता संपेल.
डे-नाईट कसोटी व्यतिरिक्त मी माझे व रवी शास्त्रीचे वक्तव्य वाचले. तो नेहमी विश्वासाने बोलतो. नागपूरमध्ये जर प्लेसिस व आमला विश्वासाने खेळू शकतात, तर उर्वरित फलंदाज का खेळू शकत नाहीत, हे शास्त्रीचे वक्तव्य योग्यच आहे. मला आठवते ज्यावेळी सुनील गावसकर १९८७ मध्ये पाकिस्ताविरुद्ध बंगलोरमध्ये अखेरचा कसोटी सामना खेळत होते. त्यावेळी त्यांनी ९६ धावांची संस्मरणीय खेळी केली होती. त्यावेळची खेळपट्टी नागपूरच्या खेळपट्टीच्या तुलनेत अधिक खराब होती. त्या खेळपट्टीवर चेंडू अधिक वळत होता. टर्निंग विकेटवर खेळताना त्यासाठी तयारी करावी लागते.
दिल्ली खेळपट्टीवरही लवकरच तसेच चेंडू वळतील, अशी आशा आहे. खेळपट्टी कुस्तीचा आखाडा होत नाही तोपर्यंत कुणाला त्याबाबत चिंता करण्याची गरज नाही. (टीसीएम)