...तर 2004 अथेन्स ऑलिम्पिकसाठी अंजूला मिळेल रौप्यपदक
By Admin | Updated: March 29, 2017 11:35 IST2017-03-29T11:17:23+5:302017-03-29T11:35:13+5:30
2003 साली पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंजूने कांस्यपदक मिळवल्यानंतर अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती.

...तर 2004 अथेन्स ऑलिम्पिकसाठी अंजूला मिळेल रौप्यपदक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - लांब उडीच्या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकीक वाढवणारी भारताची अव्वल अॅथलिट अंजू बॉबी जॉर्जला 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेसाठी रौप्यपदक मिळू शकते. अथेन्समध्ये लांब उडीमधील महिला गटातील पदक विजेत्यांची चौकशी केली तर, अंजूच्या नावावर ऑलिम्पिक रौप्यपदकाची नोंद होऊ शकते.
2003 साली पॅरिस येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंजूने कांस्यपदक मिळवल्यानंतर अथेन्स ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला अॅथलिट आहे. अथेन्समध्ये लांब उडीच्या अंतिम फेरीत अंजूला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. ऑस्ट्रेलियाची ब्रॉनवायन थॉम्पसनला चौथे तर, जाडे जॉन्सनला सहावे स्थान मिळाले होते.
या स्पर्धेत अंजूने 6.83 मीटर एवढी लांब उडी मारत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. जो अजूनही कायम आहे. अथेन्समध्ये लांब उडीमध्ये रशियन महिला अॅथलिटसनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकावर नाव कोरले होते. तातयाना लीबीडेवा, इरीना सीमाजीना आणि तातयाना कोटोवा या लांब उडीतील पदक विजेत्या तिन्ही अॅथलिटसनंतर डोप चाचणीत पकडल्या गेल्या.
अथेन्समध्ये सुवर्णपदक मिळवणा-या लीबीडेवाचा उत्तेजक चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर 2008 बिजींग ऑलिम्पिकमध्ये तीने जिंकलेली दोन रौप्यपदके तिच्याकडून काढून घेण्यात आली. इरीना डोप चाचणीत सापडल्याने 2012 मध्ये तिच्यावर दोनवर्षांची बंदी घालण्यात आली. त्यामुळे तिला लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आले नाही. कोटोव्हाचे नमुने सुद्धा 2013 मध्ये पॉझिटीव्ह आल्यानंतर तिच्याकडून 2005 वर्ल्ड चॅम्पियनशीपमधील पदक काढून घेण्यात आले.
त्याचा फायदा अंजू बॉबी जॉर्जला झाला. अंजूच्या रौप्यपदकात बदल होऊन तिला सुवर्णपदक मिळाले. अथेन्सच्या तिन्ही पदक विजेत्या उत्तेजक सेवनात दोषी आढळल्याने अंजू, थॉम्पसन आणि जॉन्सन अॅथलॅटीक्सच्या आंतरराष्ट्रीय परिषदेकडे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे दाद मागण्याची तयारी करत आहेत.
- अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव पदक मिळाले होते. राज्यवर्धन राठोड यांनी नेमबाजीच्या डबल ट्रॅप प्रकारात रौप्यपदक मिळाले होते. सध्या ते केंद्रात राज्यमंत्री आहेत.