अजिंक्य रहाणेला सर्वच प्रकारात खेळवा
By Admin | Updated: December 8, 2015 02:17 IST2015-12-08T02:17:35+5:302015-12-08T02:17:35+5:30
एबीला सलाम. डिव्हिलियर्सने कुठल्याही प्रकारात खेळण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. हा तोच खेळाडू ज्याने मुंबई येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा मारा चोपून काढला होता.

अजिंक्य रहाणेला सर्वच प्रकारात खेळवा
एबीला सलाम. डिव्हिलियर्सने कुठल्याही प्रकारात खेळण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. हा तोच खेळाडू ज्याने मुंबई येथे खेळल्या गेलेल्या अखेरच्या वन-डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा मारा चोपून काढला होता.
फिरोज शाहा कोटला मैदानावर मात्र हाच एबी संघाला सुस्थिती गाठून देण्यासाठी लढत होता. तो खडकाप्रमाणे अभेद्य होता, पण त्याला सामना अनिर्णीत राखून देण्यात अपयश आले, पण त्याची संयमी फलंदाजी मात्र कायम स्मरणात राहील. क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारत तो जगात सर्वोत्तम आहे, यात वादच नाही. आक्रमक फलंदाजाच्या या अवताराबाबत उत्सुकता वाटली. कारण तो प्रत्येक चेंडू थोपविण्याचा प्रयत्न करीत होता. आजच्या खेळीवरून फलंदाज म्हणून त्याच्या क्षमतेची प्रचिती आली. त्याचप्रमाणे मनावर त्याचे पूर्ण नियंत्रण असल्याचे दिसून आले. प्रत्येक चेंडू थोपविणे म्हणजे नकारात्मक रणनीती होती. त्यांनी रविवारी भारतीय संघाविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला असता तर यजमान संघावर दडपण आणता आले असते. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते, पण तुम्ही नकारात्मक पवित्रा स्वीकारला तर कुठल्याही क्षणी बाद होण्याचा धोका असतो. पण, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला ३-० ने पराभूत केल्यामुळे भारतीय संघाचे अभिनंदन. कर्णधार विराट कोहली अॅण्ड कंपनीचे विशेष अभिनंदन. त्यांची ही कामगिरी संस्मरणीय आहे. माझ्या मते उभय संघांसाठी खेळपट्ट्या सारख्याच होत्या. पण, दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या दोन सामन्यानंतर मानसिकदृष्ट्या पराभूत झाला होता. या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाची फलंदाजी अपयशी ठरली असली तरी त्यांच्या गोलंदाजांनी मात्र तुल्यबळ लढत दिली. अमलाचा नकारात्मक पवित्रा सामना अनिर्णीत राहील किंवा भारत जिंकेल, असा दर्शविणारा होता. त्याने चांगले फटके मारावेत असे मनोमन वाटत होते. चेंडू कसा येतो आहे हे ओळखून तो खेळू शकला असता पण असे घडले नाही. हा पवित्रा योग्य नव्हताच. या मालिकेत भारताने आफ्रिकेला चारीमुंड्या चीत केले आहे. कसोटी सामन्यादरम्यान प्रत्येक कसोटीत दरदिवशी भारताने तीनपैकी दोन सत्रात वर्चस्व गाजविले हेच खरे.
आफ्रिका साधारणपणे आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळतो पण या मालिकेत त्यांची मानसिकता पराभूताची होती. या सामन्यात किमान आक्रमकपणा दाखवायला हवा होता पण तो भारताने दाखविला. रिव्हर्स स्विंगमध्ये उमेशने मला प्रभावित केले. मी त्याचा मारा पहातच राहिलो. चाहत्यांच्या दडपणात सुरेख कामगिरी करण्याबद्दल दबाव होता पण मालिका जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. आता विदेशात हा संघ कशी कामगिरी करतो यावर भारताची कसोटीत वाटचाल अवलंबून असेल. या मालिकेत रविचंद्रन अश्विनने सर्वांचे लक्ष वेधले. अजिंक्य रहाणेचेही तंत्र आणि स्ट्रोक्स मनाला भावले. अजिंक्यसारखे खेळाडू
इतरही संघात असतील तर त्यांना
प्रत्येक प्रकारात खेळवायला हवे. भारतही अजिंक्यला सर्वच प्रकारात
संधी देऊ शकतो. माझ्या स्मरणात असलेली लॉडर््सवरील त्याची खेळी अप्रतिम होती. (टीसीएम)