अतिरिक्त गोलंदाजांना पसंती
By Admin | Updated: June 16, 2015 02:10 IST2015-06-16T02:10:59+5:302015-06-16T02:10:59+5:30
टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार व सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा भर संघामध्ये एका अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यावर असतो.

अतिरिक्त गोलंदाजांना पसंती
फातुल्ला : टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार व सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचा भर संघामध्ये एका अतिरिक्त गोलंदाजाचा समावेश करण्यावर असतो. संघातील हा बदल त्याला अधिक आवडतो.
महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराटने संघात अतिरिक्त गोलंदाजाला खेळविण्यास प्राधान्य दिले आहे. धोनी सामन्यात ४ गोलंदाजांसह खेळण्याची रणनीती वापरत होता, तर विराट ५ गोलंदाजांसह खेळण्यास प्राधान्य देतो. विराटच्या रणनीतीबाबत आताच भाष्य करणे घाईचे ठरेल; पण बांगलादेशाविरुद्धच्या लढतीत त्याची ही रणनीती यशस्वी ठरत असल्याचे चित्र दिसले.
भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान फातुल्लामध्ये खेळल्या गेलेल्या लढतीत पावसाने वर्चस्व गाजवले. अखेर ही लढत ‘ड्रॉ’ झाली; पण २६ वर्षीय कर्णधार विराटची रणनीती यशस्वी ठरल्याचे दिसून आले. टीम इंडियाला बांगलादेशाचा पहिला डाव गुंडाळण्यात यश आले. यापूर्वी भारतीय संघातर्फे आघाडीच्या ६ फलंदाजांना संधी मिळत होती; पण बांगलादेशाविरुद्ध रविचंद्रन आश्विन व हरभजनसिंग या दोन्ही फिरकीपटूंना संधी देण्यात आली. या दोन्ही गोलंदाजांनी एकूण ८ बळी घेतले.
विराट म्हणाला, ‘‘पाच गोलंदाजांसह खेळण्यास माझी पसंती आहे. मला आश्विनसारख्या खेळाडूंची गरज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तो ४०च्या सरासरीने फलंदाजी करण्यास सक्षम असून, गोलंदाजीमध्येही छाप पाडू शकतो. तुम्ही अष्टपैलू खेळाडूकडून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करू शकता?’’
विराट पुढे म्हणाला, ‘‘हरभजन अनुभवी खेळाडू असून, गरज भासल्यास तो फलंदाजीमध्ये योगदान देण्यास सक्षम आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा चांगला खेळाडू आहे. या तीन खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली, तर संघात ८ फलंदाज होतील. यापेक्षा एका कर्णधाराला अधिक काय हवे? काही जबाबदारी आघाडीच्या ६ खेळाडूंना घ्यावी लागते आणि आम्ही ती स्वीकारण्यास सक्षम आहोत, यावर माझा विश्वास आहे.’’ भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशाचा डाव ६६ षटकांत गुंडाळला. आश्विनने ५, तर हरभजनने ३ बळी घेतले. आश्विनने कारकिर्दीत दहाव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची कामगिरी केली, तर स्टार आॅफ स्पिनर हरभजनने जवळजवळ दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. हरभजनने यापूर्वी आयपीएल टी-२०मध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.
विराट म्हणाला, ‘‘गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकून देण्याची क्षमता असलेले खेळाडू संघात असल्यामुळे आनंद झाला. आश्विन व हरभजन या दोन्ही खेळाडूंत सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. कर्णधार म्हणून या दोन्ही खेळाडूंना एकत्र गोलंदाजी करताना बघताना आनंद झाला.’’धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कर्णधारपदी नियुक्ती झालेल्या विराटने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की प्रदीर्घ कालावधीपासून संघाचा सदस्य असलेल्या खेळाडूविना खेळताना चुकल्यासारखे वाटते. सचिन तेंडुलकर सर यांनी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली त्याही वेळी अशीच भावना होती. एकाच्या अनुपस्थितीमुळेही ड्रेसिंग रूमचा माहोल बदलतो. एक क्रिकेटर म्हणून नेहमी त्याचा सल्ला घेणे, त्याच्यासोबत चर्चा करणे, हे
सगळे बदलून जाते. ज्या आवाजाची ड्रेसिंग रूमला सवय जडलेली असते,
तो आवाज नसला म्हणजे
वेगळेच भासते. (वृत्तसंस्था)