२०११ - २८ वर्षांनी भारत पुन्हा जगज्जेता
By Admin | Updated: February 15, 2015 16:17 IST2015-02-15T16:17:21+5:302015-02-15T16:17:21+5:30
कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले.

२०११ - २८ वर्षांनी भारत पुन्हा जगज्जेता
>विश्वचषकाचे दहावे पर्व भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये पार पडले. १९ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत पार पडलेल्या विश्वचषकात संघाची संख्या १४ वर आणण्यात आली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने घरच्या प्रेक्षकांसमोर विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे सोनेरी स्वप्न पूर्ण केले.
विश्वचषकाच्या दहाव्या पर्वात डीआरएस प्रणालीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. याशिवाय अंतिम सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही आयसीसीने जाहीर केला. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानला १० व्या विश्वचषकाचे यजमानपद मिळू शकले नाही. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची विजयी परंपरा भारताने रोखली. ऑस्ट्रेलिया १९९९ नंतर विश्वचषकात एकदाही साखळी सामन्यात पराभूत झाला नव्हता. ऑस्ट्रेलियाचा हा विजयी रथ भारताने रोखला. क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले. गौतम गंभीरच्या ९८ धावा आणि महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद ९१ धावांच्या खेळीने भारताने हे लक्ष्य ४८. २ षटकांत चार गडी गमावून पार केले आणि २८ वर्षांनी भारत पुन्ह विश्वविजेता झाला. २१ वर्षांच्या कारकिर्दीत सचिनने सहा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला; परंतु जेतेपद पटकावता न आल्याची खंत त्याला सतावत होती. २००३ साली जेतेपदाच्या अगदी जवळ जाऊन भारताला परतावे लागले होते. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूने २०११चा विश्वचषक जिंकण्यासाठी जंग जंग पछाडले. अखेरीस सचिनचे हे स्वप्न पूर्ण झाले.
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ४९
एकूण धावा - २१, ३३३
एकूण विकेट्स - ७३१
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - तिलकरत्ने दिलशान - श्रीलंका (९ सामन्यात ५०० धावा)
सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज - शाहिद आफ्रिदी - पाकिस्तान ( ८ सामन्यात २१ विकेट)