‘झेनिथ’चे कामगार १५ दिवस अंधारात
By Admin | Updated: February 17, 2016 02:16 IST2016-02-17T02:16:00+5:302016-02-17T02:16:00+5:30
झेनिथ कंपनीने विजेचे बिल न भरल्याने कंपनीत राहणाऱ्या ५० कुटुंबांवर अंधारात राहायची वेळ आली आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मेणबत्ती

‘झेनिथ’चे कामगार १५ दिवस अंधारात
खालापूर : झेनिथ कंपनीने विजेचे बिल न भरल्याने कंपनीत राहणाऱ्या ५० कुटुंबांवर अंधारात राहायची वेळ आली आहे. १० वी आणि १२ वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून, वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मेणबत्ती, दिव्याच्या उजेडात अभ्यास करावा लागत आहे. १५ दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित असून, कंपनी बंद झाल्यानंतर व्यवस्थापनाने कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कंपनी बंद केल्यानंतर झेनिथच्या व्यवस्थापनाला मोकळ्या जागेत गृहप्रकल्प उभा करायचा असल्याने कंपनीच्या आवारात राहणाऱ्या कामगारांनी घरे रिकामी करावीत, म्हणून झेनिथ कंपनीने जाणीवपूर्वक विजेचे बिल भरले नसल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून केला जात आहे.
विहारी परिसरात पाइपचे उत्पादन करणाऱ्या बिर्ला उद्योग समूहाचा झेनिथ स्टील हा कारखाना २०१३ मध्ये व्यवस्थापनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केला. यामुळे कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. कारखाना बंद झाला त्यावेळी कामगार व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने कंपनीच्या आवारात असलेल्या कॉलनीमध्ये राहत होते. कारखाना सुरू होण्याची आशा संपुष्टात आल्यानंतर अनेक कामगारांनी बाहेरचा रस्ता धरला, मात्र परिस्थिती नाजूक असलेले ५० हून अधिक कामगार कुटुंबासह आजही कंपनीच्या कॉलनीमध्ये वास्तव्याला आहेत.
झेनिथ व्यवस्थापनाने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर आजवर कामगारांची कुठल्याही प्रकारची थकीत देणी दिलेली नाहीत. त्यामुळे देणी मिळेपर्यंत कंपनीतून न जाण्याचा निर्धार या ठिकाणी राहत असलेल्या कामगारांनी केला आहे. झेनिथच्या व्यवस्थापनाला मात्र सर्व जागा मोकळी करून भव्य गृहप्रकल्प उभा करायचा आहे. कंपनीत काही कामगार राहत असल्याने गृहप्रकल्प उभा करायला अडचणी येत असल्याने व्यवस्थापनाने जाणीवपूर्वक वीज बिल भरले नाही, असा आरोप कामगारांकडून केला जात आहे. कामगारांनी वीज वितरण कंपनी व पोलिसांकडेही तक्र ार केली आहे.झेनिथ व्यवस्थापनाने सुमारे २० लाख रुपयांचे बिल भरलेले नाही. व्यवस्थापनाला याबाबत अनेकदा नोटीस दिल्यानंतरही दखल न घेतल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. कंपनीने थकलेल्या बिलाची रक्कम जमा केल्यानंतर तातडीने वीजपुरवठा पूर्ववत होईल.
- विशाल नांदगावे,
उप कार्यकारी अभियंता,
वीज वितरण कंपनी, खोपोली