निधीअभावी रखडले करंजा बंदराचे काम

By Admin | Updated: August 29, 2016 05:13 IST2016-08-29T05:13:13+5:302016-08-29T05:13:13+5:30

मुंबईतील ससून डॉक बंदरावरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्ययावत बंदर उभारण्यात येत आहे

Work of Karjna Port | निधीअभावी रखडले करंजा बंदराचे काम

निधीअभावी रखडले करंजा बंदराचे काम

मधुकर ठाकूर,  उरण
मुंबईतील ससून डॉक बंदरावरील ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे अद्ययावत बंदर उभारण्यात येत आहे. मात्र निधीअभावी बंदराचे काम ठप्प झाले आहे. करंजा बंदर उभारणीसाठी लागणारा खर्च ६८ कोटी रुपयांवरून १५० कोटींपर्यंत पोहोचल्याने निधी अपुरा पडत असल्याने ठेकेदाराने बंदराचे काम बंद केले आहे. काम रखडल्याने मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष आहे.
रायगड जिल्ह्यातील मच्छीमारीसाठी करंजा येथे ६०० मीटर लांबीच्या आधुनिक बंदर उभारणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला होता. १५० कोटींच्या खर्चाचे बंदर दोन टप्प्यात उभारण्यात येत आहे. एकाच वेळी एक हजार मच्छीमार बोटी लागण्याच्या क्षमतेचे सर्व सोयीसुविधांयुक्त बंदर मत्स्य व्यावसायिकांसाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे मासळी व्यवसाय तेजीत येणार असून नव्या बंदरामुळे आधारित छोटे - मोठे उद्योगही उभे राहणार असल्याने सुमारे २५ हजार लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
मुंबईत मच्छीमारांसाठी ससून डॉक आणि भाऊचा धक्काजवळील कसारा बंदर (न्यू फिश जेट्टी) अशी दोन बंदरे आहेत. कसारा बंदर या आधीच गुजराती मच्छीमारांसाठी सरकारने आंदण दिले आहे. त्यामुळे मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांसाठी ससून डॉक हेच एकमेव बंदर उरले आहे. तिन्ही जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदराच्या आश्रयाला येतात. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी ससून डॉक बंदरातच डिझेल, बर्फ आणि इतर आवश्यक साधनसामग्री बोटीत भरण्यात येते. मासेमारी करून परतल्यानंतर याच बंदरात मासळी उतरवितात. लिलाव करून मासळी विक्री करतात. ससून डॉक बंदराची ७०० मासेमारी बोटी लागण्याची क्षमता आहे. मात्र अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने मुंबई, रायगड, ठाणे या तीन जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी ससून डॉक बंदरात लँड होतो. क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने ससून डॉक मच्छीमार बोटी येत असल्याने मोठी गर्दी होती. यामुळे बंदरावर मोठा ताण पडत असल्याने मच्छीमारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
ससून डॉक बंदरावरील वाढता ताण दूर करण्यासाठी आणि मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा बंदरात अद्ययावत, सर्व सोयींनीयुक्त आधुनिक बंदर उभारण्यात यावे, अशी मागणी मच्छीमारांची केली होती आणि करंजा मच्छीमारी संस्थेने राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे शासनानेही मच्छीमारांच्या मागणीची दखल घेवून करंजा खाडी किनारी एक हजार मच्छीमार बोटी लागण्याच्या क्षमतेचे अत्याधुनिक बंदर उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. ६०० मीटर लांबीच्या करंजा बंदरात आधुनिक फिश लॅडिंग जेट्टी, वेस्टवॉर ट्रिटमेंट प्लांट, रेडिओ अँड कम्युनिकेशन सेंटर, फिश प्रोसेसर, शीतगृह, मासळी लिलाव आणि विक्री केंद्र, इंधनासाठी डिझेल पंप इत्यादी अत्याधुनिक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली होती. या प्रस्तावाला २००२ साली प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी आणि निधी तरतुदीअभावी बंदराचे काम लांबणीवर पडत होते. अखेर २०१२ मध्ये निधी मंजूर होवून प्रत्यक्ष सुरुवात झाली.
करंजा बंदराचे दोन टप्प्यात काम करण्यात येणार आहे. पहिल्या २५० मीटर लांबीचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये भराव आणि बंदराच्या पायलिंगच्या कामाचा समावेश आहे. हे काम दोन वर्षांच्या मुदतीत पूर्ण केले जाणार असून त्यासाठी ५७ कोटी ८३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही पहिले काम संपताच सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक करंजा बंदर २०१७ मध्ये पूर्णत्वास जाईल असे मानले जात होते. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील हजारो मच्छीमार बोटी मुंबईच्या ससून डॉक बंदराऐवजी करंजा बंदरात लँड होतील. त्यामुळे ससून डॉक बंदरावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र ब्रेक वॉटरच्या कामानंतर उत्खननात चिखल मातीऐवजी दगड लागला आहे. यासाठी अतिरिक्त निधी खर्च होणार आहे. मात्र त्यासाठी निधीची कमतरता भासत असल्याने करंजा बंदराचे काम मागील काही महिन्यांपासून ठेकेदाराने बंद केले आहे.

Web Title: Work of Karjna Port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.