लग्नाच्या बेडीआधी स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 03:10 IST2016-04-25T03:10:35+5:302016-04-25T03:10:35+5:30

लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल

Wedding cleanliness of the wedding | लग्नाच्या बेडीआधी स्वच्छता

लग्नाच्या बेडीआधी स्वच्छता

आविष्कार देसाई,  अलिबाग
लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल, तर आपल्या आत्मसन्मानासाठी आधी ते बांधायला सांगा, त्यानंतरच लग्न करा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाने केले आहे.
सध्या सर्वत्रच लग्नसराईची धामधूम सुरु आहे. एप्रिल-मे या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये प्रत्येकी सरासरी पंधराशे लग्न सोहळे उरकणार आहेत. त्यामुळे पाणी व स्वच्छता विभागाने स्वच्छतेचा संदेश पोचविण्यासाठी लग्नसराईचा मुहूर्त साधला आहे. स्वच्छ भारत अभियान संपूर्णपणे यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यात युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांची मानसिकता अद्याप बदलण्यात पाणी व स्वच्छता विभागाला पुरेसे यश आल्याचे दिसून येत नाही. विविध उपक्रम राबवून शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकारने दिलेले टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आता थेट नारीशक्तीला भावनिक साद घातली आहे. यासाठी लग्नसोहळे अजेंड्यावर घेण्यात आले आहेत. एप्रिल आणि मे २०१६ याकालावधीमध्ये असणाऱ्या विविध मुहूर्तांवर १५ तालुक्यात प्रत्येकी सुमारे पंधराशेपेक्षा अधिक संख्येने लग्नसोहळे पार पडणार असल्याची माहिती पुरोहित शशिकांत कुंटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मे महिन्यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात मुहूर्त आहेत. त्यामुळे आताच लग्न उरकून घेण्याची मानसिकता लग्नांच्या संख्येवरुन दिसून येते असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शौचालये बांधणे अद्याप बाकी आहे. नागरिकांचे प्रबोधन थोड्या हटके पध्दतीने केले, तर नागरिकांच्या ते कायमचे लक्षात राहते. यासाठी लग्नसराईचा मुहूर्त साधण्यात आला आहे. जेणेकरुन महिला वर्गामध्ये स्वच्छतेचा संदेश जाईल आणि सासरी शौचालय आहे की नाही याची माहिती घेतील. त्याचा सकारात्मक परिणाम मिळू शकेल असे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.सासरी मुलीला कोणतीही कमतरता भासू नये म्हणून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी, मोबाइल, भांडी, दागिने अशा विविध महागड्या वस्तू दिल्या जातात. मात्र सासरी शौचालय आहे की नाही याची माहिती घेतली जात नाही. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी माहेर आणि सासरच्या मंडळींनी शौचालय उभारुन देणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार सर्व मदत करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.

Web Title: Wedding cleanliness of the wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.