जलवाहिनीसाठी खाडीत भराव!
By Admin | Updated: July 6, 2016 02:32 IST2016-07-06T02:32:42+5:302016-07-06T02:32:42+5:30
कामोठे ते खारघर नोडला जोडण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता खाडीप्रवण क्षेत्रात बांध घातला जात आहे. त्यामुळे कळंबोलीतील होल्डिंग पाँडमधून येणाऱ्या

जलवाहिनीसाठी खाडीत भराव!
- अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कामोठे ते खारघर नोडला जोडण्याकरिता जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. त्याकरिता खाडीप्रवण क्षेत्रात बांध घातला जात आहे. त्यामुळे कळंबोलीतील होल्डिंग पाँडमधून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. कमी पावसातही वसाहतीत पाणी साचत आहे.
कामोठे-खारघर दरम्यान जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून होता. मात्र खाडीप्रवण क्षेत्र असल्याने वन, पर्यावरण व इतर विभागाकडून परवानगी मिळत नव्हती. काही महिन्यांपूर्वी या कामाकरिता उच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्याचबरोबर पर्यावरण व वन विभागाने हिरवा कंदील दाखवला. या कामाकरिता कोया अँड कंपनी ही एजन्सी नियुक्त करून त्वरित कामाला सुरुवात करण्यात आली. सिडकोने या अगोदर वाहिनी टाकण्याकरिता बांध घातला होता. त्या ठिकाणी पायलिंग करून कॉलम उभारण्यात आले आणि त्यावर आता पाइप सुध्दा टाकण्यात आले आहेत. कामोठे मानसरोवर हॉटेल ते खारघर सेक्टर २६ दरम्यान १५०० एमएम व्यासाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. याकरिता माती टाकून बांध करण्यात आला आहे. काही ठिकाणी लोखंडी पूल उभारण्यात आले आहेत. मात्र यामुळे कळंबोली वसाहतीकडून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याकरिता ही जमीन ठेवण्यात आली होती. परंतु या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याकरिता मोठ्या प्रमाणात भराव झाला आहे. याच कारणाने कळंबोली वसाहतीतील पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग अडला गेला आहे.
कळंबोली वसाहत विकसित करत असताना योग्य नियोजन न केल्याने वसाहत साडेतीन मीटर खाली राहिली याकरिता आपण न्यायालयीन लढाई लढत आहोतच. त्याचबरोबर पाण्याचा अडसर निर्माण होईल हे माहीत असतानाही सिडकोने कामोठे बाजूने वाहिन्या टाकल्या असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. कळंबोली बाजूने एमजेपीच्या जुन्या वाहिन्याच्या जागेवर नवीन वाहिनी टाकण्याचा प्रस्ताव त्यांनी सिडकोला दिला होता. परंतु तो मान्य न करता प्राधिकरणाने विरोधी बाजूला वाहिन्या टाकून कोट्यवधी रुपये खर्च पाण्यात घातला आहे. त्याचबरोबर कळंबोलीकरांसमोर पुराचे संकट उभे केला आहे. या संदर्भात आत्माराम पाटील यांनी सिडकोला पत्र दिले आहे. पावसाच्या पाण्याला जाण्याकरिता वाट करून देण्याची मागणी पत्रात केली आहे.
पनवेल-सायन महामार्गामुळे पाणी अडले
पनवेल-सायन महामार्गाचेरुंदीकरण आणि पूल बांधण्याच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळी पाणी जाण्याचे मार्ग अडवून धरले. संबंधित ठेकेदाराने भराव करून काही ठिकाणी कळंबोली परिसरात हे नाले बुजवून टाकले आहेत. याबाबत सिडको निद्रिस्त अवस्थेत आहेच, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानेही डोळेझाक केली आहे.
कामोठे-खारघर जलवाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाला आणि त्यावर नियंत्रणही दुसऱ्या विभागाकडे आहे. याबाबत पाहणी करून वरिष्ठांबरोबर चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्यात येईल.
- किरण फणसे,
अधीक्षक अभियंता