पाणी संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस
By Admin | Updated: February 17, 2016 02:18 IST2016-02-17T02:18:45+5:302016-02-17T02:18:45+5:30
पेण ते वर्षा संघर्ष पाणी पायी वारीला वाशी येथे जलसंपदा विभागाच्या व उत्तर कोकण पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता

पाणी संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस
पेण : पेण ते वर्षा संघर्ष पाणी पायी वारीला वाशी येथे जलसंपदा विभागाच्या व उत्तर कोकण पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व कोलाड इरिगेशनच्या कार्यकारी अभियंतावर्गाने आ. धैर्यशील पाटील व पायी वारीत सहभागी झालेल्या शेकापच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सिंचनाचा अनुशेष अपूर्ण राहिलेल्या कामाबाबत तातडीने उपाययोजनावर भर देणार, असे आश्वासन देण्यासाठी भेट घेतली. मात्र वाशी सेक्टर ७ मधील स्वयंभू शिवमंदिरात झालेल्या या अनौपचारिक भेटीत आ. धैर्यशील पाटील यांनी ठणकावले.
पाटील म्हणाले की, आश्वासनांची साखरपेरणी आता बंद करा. मागील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. तुमच्या अधिकार क्षेत्रात जे नाही ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आता व्हायचे ते थेट मुख्यमंत्र्यांसोबतच होणार. कालव्याला पाणी आमच्या संघर्षातूनच मिळविणार आहोत, असे ठणकावले.
हेटवणे धरणाची निर्मितीच मुळात सिंचनावर आधारित पेणच्या ५२ गावांतील शेतकऱ्यांची ६ हजार ६६८ हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी आजवर जलसंपदा विभागाने कार्यवाही केली नाही. २०१३ च्या आॅगस्ट महिन्यात कोकण पाटबंधारे मंडळाच्या सर्व अधिकारीवर्गाची बैठक दिवंगत शेकापचे माजी मंत्री व भाई मोहनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी २०१३ सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व्हे करून अडथळे दूर करताना जानेवारी २०१४च्या प्रारंभालाच कालव्याची रखडलेली कामे दूर करण्याचे बैठकीत उपस्थित शेतकरीवर्ग व शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांना लेखी इतिवृत्तात दिले होते, ते आश्वासन पाळले नाही.
त्यावेळी बैठकीस असलेले आ. धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते दिनेश पाटील, के. डी. पाटील, महादेव दिवेकर जलसंपदा विभागाच्या साखरपेरणीचा चांगला अनुभव होता. त्यामुळे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी मुख्य अभियंता अन्सारी, अधीक्षक अभियंता अरुण काळोखे, हेटवणे कार्यकारी अभियंता सतीश गाडे आदी होते. (वार्ताहर)