खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

By Admin | Updated: August 30, 2016 03:22 IST2016-08-30T03:22:22+5:302016-08-30T03:22:22+5:30

मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे.

The water in the creek is more polluted than the criteria | खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

नामदेव मोरे,  नवी मुंबई
मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. वर्षानुवर्षे प्रदूषण पसरविणाऱ्यांवर प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नाही. यामुळे खाडीतील पाणी निकषापेक्षा तब्बल १५ पट जास्त दूषित झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाणही घटले असून पाण्यातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. हवा व ध्वनी प्रदूषणाबरोबर पाणी प्रदूषणाची स्थितीही गंभीर झाली आहे. शहरात पिण्याचे पाणी शुद्ध असले तरी नाले, तलाव व खाडीतील पाणी प्रमाणापेक्षाही जास्त दूषित झाले असल्याचे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालावरून समोर आले आहे.
ऐरोलीच्या दिवा ते बेलापूरच्या दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला आहे. दिवाळे, वाशी, सारसोळे, करावे व इतर अनेक गावांमधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. वाशीतील गुणाबाई सुतार या महिला विदेशात खेकडे निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये प्रदूषणामुळे खाडीतील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एमआयडीसीतील केमिकल कंपनीमधील पाणी प्रक्रिया करून खाडीत सोडणे आवश्यक आहे. परंतु अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी खाडीत सोडत आहेत. याशिवाय मुंबई व ठाणेमधील मलनि:सारणसह सर्व दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे.
खाडीमधील पाण्यात क्लोराईडची मात्रा ६०० एमजीएल एवढी असणे आवश्यक आहे. परंतु शहरात ऐरोलीमध्ये सर्वात कमी ६०६० व वाशीमध्ये सर्वात जास्त १५१८८ एमजीएल एवढे आहे. क्लोराईडचे प्रमाण सरासरी १५ टक्के एवढे जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खाडीच्या पाण्यामधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्यातील डीओ चे प्रमाण ४ ते ७ एवढे आवश्यक आहे. परंतु ऐरोलीमध्ये ते १.७ व सानपाडाजवळ ३.५ एवढी कमी आढळले आहे. वाशीमध्ये पाण्यातील बीओडीचे प्रमाण निकषांपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे.
महापालिका क्षेत्रामध्ये १० मुख्य नाले व इतर २० छोटे नाले आहेत. एकूण ७४,२८२ मीटर लांबीचे असून ते डोंगरावरील पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेतात. परंतु याच पाण्यातून उद्योजक रसायनमिश्रित पाणी खाडीमध्ये सोडून देत आहेत. तुर्भेमधील नाल्यात सस्पेंडेड सॉलिड्सचे प्रमाण दुप्पट आहे. तुर्भे वाशी सेक्टर १८ व नेरूळ पामबीच रोडजवळील नाल्यात क्लोराईडचे प्रमाण जास्त आढळले आहे. या सर्वांचा परिणाम खाडीतील जीवसृष्टीवर होत आहे. खाडीत मासे सापडत नसल्याने कोळी बांधवांना समुद्रात दूरवर जावे लागत असून अशीच स्थिती राहिली तर मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती वाटू लागली आहे.

Web Title: The water in the creek is more polluted than the criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.