आकाशवाणीच्या एफएम वाहिनीवर आता विविध भारती
By Admin | Updated: March 18, 2015 01:59 IST2015-03-18T01:59:28+5:302015-03-18T01:59:28+5:30
येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली.

आकाशवाणीच्या एफएम वाहिनीवर आता विविध भारती
मुंबई : येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली.
मुंबईत विविध भारती सेवेसाठी नवीन एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आलेय, त्या वेळी राजवर्धन राठोड बोलत होते. याप्रसंगी आकाशवाणीचे महासंचालक फय्याद शरयाद, प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी, चित्रपट अभिनेते जॅकी श्रॉफ आणि विक्रम गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
राजवर्धन राठोड म्हणाले, की संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करून देण्यासाठी थोडा वेळ लागेल, मात्र ते नक्की होईल. सध्या देशाच्या ४० टक्के भागात एफएम सेवा उपलब्ध आहे. पुढील दोन ते अडीच वर्षांत ती ६० टक्के भागात नेण्याचा प्रयत्न आहे. देशात ४०० ट्रान्समीटर्स उपलब्ध असून, आगामी तीन वर्षांत आणखी २५० ट्रान्समीटर्स घेतले जातील. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे जुन्या मित्रांप्रमाणे आहेत आणि आपण त्यांना गृहीत धरतो. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी आकाशवाणीवरून संवाद साधण्यामुळे आकाशवाणीला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. देशात ९२ टक्के इतकी व्याप्ती असलेल्या आकाशवाणीला प्रत्येकाच्या आयुष्यात स्थान आहे. रेडिओवरून आपल्याला माहिती, ज्ञान मिळते आणि मनोरंजनही होते. (प्रतिनिधी)
102.8
मेगाहटर््झ
एफएम विविध भारती वाहिनी १०२.८ मेगाहर्ट्झवर उपलब्ध असून, मुंबई आसपासच्या परिसरातील सुमारे दोन कोटी लोकांना तिचा लाभ होईल. मोबाइलवर तसेच प्रवासात देखील आता विविध भारतीची सेवा एफएममुळे उपलब्ध झाली आहे. त्याचप्रमाणे लघु आणि मध्यम लहरींवर देखील विविध भारतीचे कार्यक्रम सुरू राहतील.
भारत सरकारची कल्पना
जेव्हा देशात जनतेच्या मनोरंजनासाठी वाहून घेतलेली कोणतीही वाहिनी नव्हती, तेव्हा विविध भारतीचा
उदय झाला. त्या वेळी आपल्या शेजारी देशाचे रेडिओ सिलोन हे एकमात्र विरंगुळ्याचे साधन होते. संगीताच्या सुवर्णयुगात नागरिकांसाठी मनोरंजन वाहिनी सुरू करण्याची कल्पना भारत सरकारला सुचली आणि विविध भारती सेवेला प्रारंभ झाला.
मजबूत पकड : सुमारे सहा दशकांच्या प्रवासानंतरही आजच्या आधुनिक प्रसारण युगात विविध भारतीची पकड मजबूत आहे आणि आता एफएम च्या माध्यमातूनही अनेकांना हा आनंद उपभोगता येणार आहे.
विविध भारतीचा प्रवास : सुरुवातीला ही सेवा दिल्लीमध्ये होती. १९७२-७३ मध्ये मुंबईत चर्चगेट येथे विविध भारतीचे प्रसारण हलवण्यात आले आणि १९९८-९९ मध्ये अखेरीस ते बोरीवली येथे हलवण्यात आले. १ मे २००० रोजी थेट प्रसारण सुरू झाले, तर १६ डिसेंबर २००४ रोजी डीटीएच सेवा सुरू झाली.
पहिली उद्घोषणा १९५८मध्ये : ३ आॅक्टोबर १९५७ रोजी आकाशवाणीवरून शीलकुमार शर्मा यांच्या आवाजात पहिली उद्घोषणा झाली, ती अशी ‘यह विविध भारती हैं, आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम’ विविध भारतीवर पहिले गाणे ऐकवण्यात आले, ते होते ‘नाच रे मयूर’... विविध भारतीचे आद्यप्रवर्तक पंडित नरेंद्र्र शर्मा यांनी ते लिहिले होते आणि मन्ना डे यांनी ते गायले होते. अनिल विश्वास यांनी संगीत दिले होते. विविध भारतीवरून शास्त्रीय संगीताचा खजिना, महान कलाकारांच्या मुलाखतींचे कार्यक्रम देखील सादर केले गेले.