कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे वाचले रुग्णांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 01:34 IST2021-04-18T01:34:43+5:302021-04-18T01:34:43+5:30
ऐरोली कोरोना केंद्रातील आग प्रकरण

कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे वाचले रुग्णांचे प्राण
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री आग लागली. या ठिकाणी ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याने तत्काळ आग नियंत्रणात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टाळली. पाच तासांच्या प्रयत्नानंतर रात्री सव्वाएक वाजता विद्युत पुरवठा पूर्ववत झाला. विद्युत पुरवठा बंद असल्याने पहिल्या व तिसऱ्या मजल्यावरील रुग्णांची उकाड्यामुळे गैरसोय झाली.
नवी मुंबई पालिकेने १३ ठिकाणी कोरोना उपचार केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये ऐरोली सेक्टर १५ मधील लेवा पाटीदार सभागृहाचाही समावेश आहे. तीन मजल्याच्या इमारतीमध्ये ३२५ रुग्णांची क्षमता आहे. सध्या केंद्रामध्ये ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री ८ वाजता या केंद्रात शॉकसर्कीट होऊन आग लागली. कर्तव्यावर असणारा विद्युत कर्मचारी आशिष चव्हाणच्या प्रकार निदर्शनास आला. त्याने फायर इस्टींगविशरच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. काही क्षणात त्याने आग नियंत्रणात आणली. यामुळे संपूर्ण इमारतीमध्ये आग पसरली नाही. आगीविषयी ऐरोली अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी आले, परंतु तत्पूर्वी आग विझविण्यात आली होती.
आगीमुळे पहिल्या व तिसऱ्या मजल्यावरील विद्युत पुरवठा बंद झाला होता. पालिकेच्या पथकाने जळालेल्या वायर तत्काळ बदलण्याचे काम सुरू केले. रात्री सव्वाएक वाजता सर्व काम पूर्ण करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
फायर ऑडिट करण्यात यावे
शहरातील सर्व कोरोना रुग्णालयांचे पुन्हा एकदा फायर ऑडिट करण्यात यावे. सर्व केंद्रांमधील विद्युत व्यवस्था सुरळीत आहे का. वायर व इतर विद्युत उपकरणांची तपासणी करण्यात यावी. पुन्हा ऐरोलीसारख्या दुर्घटना होऊ नयेत याची काळजी घ्यावी. सर्व केंद्रांमध्ये आग विझविण्याची जादा यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. दुर्घटना घडल्यास रुग्णांना तत्काळ बाहेर काढण्यासाठीची यंत्रणाही कार्यरत असावी, अशी मागणी होत आहे.
आयुक्तांनी स्वत: दिले दक्ष
रुग्णालयात आग लागल्याचे समजल्यानंतर कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांनी तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठीची कार्यवाही सुरु केली. मनपा आयुक्त अभिजीत बांगर स्वत: अधिकऱ्यांच्या संपर्कात होते. रात्री सव्वाएक वाजता विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत आयुक्त व कार्यकारी अभियंता हे आढावा घेत होते.
कर्मचाऱ्यांचे कौतुक
आशिष चव्हाण याने तत्काळ विझविली. त्याच्या दक्षतेमुळे आग इमारतीमध्ये पसरली नाही. त्याच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यामुळे रुग्णांना काहीही इजा झाली नाही.