वाशीत पदपथ बनले धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:26 IST2017-07-30T02:26:29+5:302017-07-30T02:26:29+5:30
गटारावरील स्लॅब कोसळल्याने वाशीतील पदपथ पादचाºयांसाठी धोकादायक बनले आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारांमध्ये पादचारी पडण्याची शक्यता आहे.

वाशीत पदपथ बनले धोकादायक
नवी मुंबई : गटारावरील स्लॅब कोसळल्याने वाशीतील पदपथ पादचाºयांसाठी धोकादायक बनले आहेत. रात्रीच्या वेळी या उघड्या गटारांमध्ये पादचारी पडण्याची शक्यता आहे. यामुळे गटारांच्या दुरुस्तीसाठी सलग दोन वर्षे प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर कामाची मंजुरी मिळवण्यात लोकप्रतिनिधीला यश आले आहे.
वाशी सेक्टर ५ येथील कामगार वसाहतीशेजारील मार्गालगतच्या पदपथाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याठिकाणच्या सिडकोकालीन गटारांची पडझड सुरू असून अनेक ठिकाणी स्लॅब कोसळले आहे. पदपथाला लागूनच हे गटार असल्यामुळे त्याठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही महिन्यांपासून हे गटार उघड्या स्थितीत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पदपथावरून चालणारी एखादी व्यक्ती गटारामध्ये पडण्याची शक्यता आहे. शिवाय रहिवासी वसाहतीलगतच हे उघडे गटार असल्याने त्यामध्ये साचलेल्या घाणीमध्ये डासांची पैदास होऊन आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु या परिस्थितीला प्रशासन कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी केला आहे. परिसरातील गटारांवरील पदपथांची पडझड सुरू असून त्याच्या दुरुस्तीसाठी त्या मागील दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होत्या. मात्र प्रशासनाकडून कामाच्या बाबतीत दिरंगाई झाल्याचा त्यांचा आरोप आहे. तर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पडझड झालेल्या गटारांच्या ठिकाणी बांबू आडवे लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अखेर नुकतीच या पदपथांच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा निघाली असून गत आठवड्यात ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत.