उद्यानासाठी निर्माल्याच्या कंपोस्ट खताचा वापर
By Admin | Updated: September 29, 2015 00:49 IST2015-09-29T00:49:04+5:302015-09-29T00:49:04+5:30
कळंबोली, कामोठे वसाहतीत गणेश विसर्जनानिमित्त निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर सिडकोने कामोठे वसाहतीत कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे.

उद्यानासाठी निर्माल्याच्या कंपोस्ट खताचा वापर
अरुणकुमार मेहत्रे, कळंबोली
कळंबोली, कामोठे वसाहतीत गणेश विसर्जनानिमित्त निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर सिडकोने कामोठे वसाहतीत कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प हाती घेतला आहे. यातून तयार झालेल्या खताचा वापर उद्यान त्याचबरोबर झाडांकरिता करण्यात येणार असल्याची माहिती सिडकोने दिली.
कळंबोली व कामोठे वसाहतीत दरवर्षी साडेसात हजार घरगुती व सार्वजनिक गणपती बसविले जातात.त्यामध्ये कामोठे येथे ४१५७, व कळंबोलीत ३३८0 इतक्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. सर्वाधिक पाच दिवसांचे ३६८0 इतके बाप्पा विराजमान होतात आणि त्यांचे विसर्जनही होते. इतक्या मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा होत असल्याने त्याकरिता सिडकोला तयारी करावी लागते. कळंबोली येथील रोडपाली आणि कामोठे गाव व जुई गाव तलावात विसर्जन केले जाते. बाप्पांचे विसर्जन करीत असताना त्यांच्याबरोबर निर्माल्यही जलाशयात विसर्जित करण्यात येतअसे. त्यामुळे पाणी दूषित होवून जलचरांवर त्याचा परिणाम होत असे या कारणाने निर्माल्य पाण्यात टाकू नये, असे आवाहन विविध पर्यावरण, त्याचबरोबर सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे. पनवेल नगरपालिकेने कृत्रिम तलाव करून यावर चांगला तोडगा काढला असला तरी सिडकोमध्ये मात्र अशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र तरी सुध्दा प्रशासनाने यंदा निर्माल्याकरिता खास व्यवस्था केल्याचे आढळून आले. या कामी प्रशासन अधिकारी किरण फणसे यांनी पुढाकार घेत निर्माल्य संकलनाकरिता वेगळी सोय केली. अर्थात या कामी मिटकॉनकडूनही सकारात्मक पाऊल उचलण्यात आले. या संस्थेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. आनंद सोनवणे यांनी सुध्दा या प्रकल्पाकरिता विशेष परिश्रम घेतले. याकरिता एकूण पाच निर्माल्य कलश व्हॅन, ११ लिटरच्या सहा आणि २१0 लिटरच्यादहाअशा एकूण १६ डस्टबिन विसर्जन तलावाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. अनिरुध्द अकादमीच्या स्वयंसेवकाचे सुध्दा या कामी सहकार्य घेण्यात आले होते. गेल्या दहा दिवसात दोन वसाहतीत एकूण पाच टन निर्माल्य संकलन झाले असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले. त्यामुळे तीन तलावात निर्माल्य टाकण्यास मनाई करण्यात आली होती. (वार्ताहर)