उरणमध्ये ९० घरे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:26 IST2017-07-29T02:26:09+5:302017-07-29T02:26:11+5:30

उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

uranamadhayae-90-gharae-dhaokaadaayaka | उरणमध्ये ९० घरे धोकादायक

उरणमध्ये ९० घरे धोकादायक

उरण : उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.
मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. उरण नगरपरिषदेच्या हद्दीत बाजारपेठ, मोरा, भवरा, बोरी, कुंभारवाडा आदी ठिकाणी ९० घरे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणानंतर आढळून आले आहे. उनपने केलेल्या सर्व्हेनंतर धोकादायक ठरविण्यात आलेल्या ९० घरांमध्ये कौलारू घरे ८३, एक मजली वाडे अथवा बैठ्या चाळी ४, तर ३ इमारतींचा समावेश असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. १९६० सालापूर्वी असलेली धोकादायक घरे, वाडे, चाळी, इमारतींना उरण नगरपरिषदेने अनेकदा नोटिसाही बजावल्या आहेत. अतिवृष्टी अथवा खराब हवामानामुळे घरे, इमारती कोसळण्याची भीती असल्याने उनपने शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र, उनपच्या नोटिशींनंतर धोकादायक घरात सध्या ४३ कुटुंबे वास्तव करीत असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली.
बहुतांश धोकादायक घरांमध्ये एक मजली कौलारू घरे अथवा चाळी, वाडेच आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करीत असलेले बहुतांश कुटुंबे अनेक वर्षांपासून भाडोत्री म्हणूनच राहत आहेत. काही पगडी पद्धतीने, तर काही नाममात्र ५० ते ५०० रुपये मासिक भाडे देऊन अनेक वर्षांपासून राहात आहेत. अनेक घरांचे मालक हयात नाहीत. त्यामुळे तर मालकांच्या पश्चात असलेल्या घरमालकांच्या वारसांना भाड्यांनी दिलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात स्वारस्य नाही. घरे, इमारतींच्या दुरुस्तीची भाडोत्र्यांची इच्छा असली तरी त्यासाठी घरमालक परवानगी देण्यास तयार नाहीत. तर केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी आर्थिक सुबत्ता असतानाही अनेक भाडोत्री कुटुंबे जीव मुठीत घेऊन धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करून आहेत. तर खरोखरच भाड्याने घर घेण्याची अथवा नवीन घर घेण्याची ऐपत नसल्यानेच काही गरीब गरजू कुटुंबे नाइलाजास्तव धोकादायक घरात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील मालकी हक्काबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील वादाचे अनेक खटले निवाड्यासाठी न्यायालयात दाखल झालेले आहेत.
वादात अडकलेली अशी अनेक घरे, चाळी, इमारतींचा वापर बंद करून मालकांनी त्यांना टाळे ठोकणेच पसंत केले असल्याचीही अनेक उदाहरणे असल्याची माहितीही उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. मात्र, दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडल्यास नोटिसा बजावूनही धोकादायक घरांमध्ये राहणाºया ४३ कुटुंबीयांबाबत उनप नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

Web Title: uranamadhayae-90-gharae-dhaokaadaayaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.