बेशिस्त चालकांचे परवाने निलंबित

By Admin | Updated: July 5, 2016 02:51 IST2016-07-05T02:51:03+5:302016-07-05T02:51:03+5:30

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी

Unlicensed drivers' licenses are suspended | बेशिस्त चालकांचे परवाने निलंबित

बेशिस्त चालकांचे परवाने निलंबित

- सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी ४१९ बेशिस्त चालकांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर २५८ प्रकरणांची अद्याप सुनावणी बाकी आहे.
पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी शासन निर्देशानुसार बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्याकडून संयुक्तरीत्या होत आहे. त्याकरिता गेली तीन महिन्यांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. सिग्नल तोडणे, सीट बेल्टचा वापर न करणे, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, वाहन चालवताना फोनचा वापर करणे अशा अनेक शीर्षकाखाली या कारवाया होत आहेत. अनेकदा चालकाच्या बेशिस्तपणामुळे गंभीर अपघात घडत असतात. त्यामध्ये निष्पाप प्रवासी किंवा पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. यामुळे राज्यातले अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बेशिस्त चालकांविरोधात तीव्र कारवाई करून त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवून घेतले जात आहेत. वाहतूक पोलिसांतर्फे यापूर्वी देखील अनेकदा मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाया केलेल्या आहेत.
सद्यस्थितीला तरुणांमध्ये दुचाकीवर धूम ठोकण्याचे प्रमाण अधिक असून अनेक अपघातांमध्ये अशा तरुणांचा बळी गेलेला आहे. यामुळे महाविद्यालयीन तरुणांना शिस्त लावण्याकरिता देखील वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. यानंतरही शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. अशांविरोधात पुन्हा एकदा कारवाईची मोहीम उभारून ठिकठिकाणी पथकांच्या माध्यमातून बेशिस्त चालकांचा शोध घेतला जात आहे. यानुसार मागील तीन महिन्यात ८७७ जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी ४१९ जणांचे वाहनचालक परवाने ९० दिवसांकरिता निलंबित केल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. तर २५८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक केल्यामुळे किंवा मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यामुळे देखील अपघात होत असतात. अशांवर देखील आरटीओने कारवाईचा दणका लावला आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये दंड स्वरूपात ३९ लाख ५२ हजार रुपये आरटीओकडे जमा झाले आहेत.

Web Title: Unlicensed drivers' licenses are suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.