टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर
By Admin | Updated: October 23, 2016 03:31 IST2016-10-23T03:31:18+5:302016-10-23T03:31:18+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर
- कमलाकर कांबळे, नवी मुंबई
आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात स्थलांतर केले आहे. यात टाळेबंदी जाहिर करून आपला गाशा गुंडाळणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जाचक औद्योगीक धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि महापालिकेकडून कर वसुलीसाठी केली जाणारी सक्तीची कारवाई आदीचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.
पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगीक क्षेत्रात सध्या लहान मोठो ३५00 हजार युनिटस कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यवसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगीक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरीत केले आहे. विशेषत: मागील बारा वर्षात या प्रक्रियेने अधिक वेग घेतल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षापूर्वीर् महापे औद्योगीक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभरलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरीत केले आहे. गुजरातचे औद्योगीक धोरण उद्योग वाढील पोषक ठरले आहे. येथील तयार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर आकारणीतील पारदर्शकता तरूण उद्योजकांना भूरळ घालीत आहे. त्यामुळे अनेक उद्योजक आपले येथील उद्योग बंद करून गुजरातची वाट धरताना दिसत आहेत. त्यामुळे इतर छोट्या उद्योजकांत व त्याअुषंगाने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत विविध करापोटी महापालिकेने येथील उद्योजगांकडून कोट्यवधी रूपयांचा कर वसूल केला आहे. त्याबदल्यात देण्यात येणाऱ्या सुविधा नगण्य असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. येथील रस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे आदींची दुरवस्था झाली आहे. यावर्षी तर या परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. यातच महापालिकेने पुन्हा थकीत कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहे. करवसुलीच्या अनेकांना सक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांत महापालिकेविषयी नाराजीचे सूर आहेत. एकूणच सध्या निर्माण झालेली परिस्थिती येथील उद्योग वाढीला मारक ठरत असल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्कारल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यात या क्षेत्रातील लहान मोठे जवळपास पंधरा उद्योग बंद करण्यात आले आहेत.
सुविधा द्या, मगच करभरणा
कर वसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मागील काही वर्षात कराचा भरणा न करणाऱ्या उद्योजकांवर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योजकांत असंतोष निर्माण झाला आहे. मुळात कर आकारण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही. असे असतानाही आम्ही कर भरायला तयार आहोत. त्याबदल्यात आम्हाला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे.