पोलीस बंदोबस्तात कचरा वाहतूक
By Admin | Updated: October 28, 2016 03:58 IST2016-10-28T03:58:31+5:302016-10-28T03:58:31+5:30
शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ

पोलीस बंदोबस्तात कचरा वाहतूक
नवी मुंबई : शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ व इतर काही ठिकाणी कचरा उचलणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यात आली.
चार महिने पगार मिळाला नसल्याचे कारण देवून शहरातील कंत्राटी कामगारांनी रविवारपासून साफसफाईची कामे थांबविली असून कचरा वाहतूकही बंद केली आहे. कचरा न उचलल्याने शहरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सोसायट्यांमधील स्थितीही गंभीर झाली आहे. आंदोलन करणाऱ्या कामगारांना आवाहन करूनही संप मागे घेण्यात आला नाही. बुधवारी तुर्भे हनुमाननगर येथे शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले व तय्यब पटेल यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी तीव्र विरोध केला. कचरा उचलणार नाही व उचलू देणार नाही या भूमिकेमुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असंतोषाचा उद्रेक होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचरा उचलण्यास सुरवात केली. दिवसभर ५०० टन कचरा उचलण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कचरा वाहतूक सुरू होती.
कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची तयारी होती, पण साफसफाई करणाऱ्या कामगारांनी त्यांना काम करण्यास विरोध केला होता. कचऱ्याचे ढीग साचल्याशिवाय आंदोलनाचे परिणाम दिसणार नसल्यामुळे दादागिरी करून कोणालाच काम करू दिले जात नव्हते. गुरूवारीही आंदोलकांनी नेरूळमध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण केली. एक कामगार जखमी झाला आहे. कोपरखैरणे व बेलापूरमध्येही कचरा उचलण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. अखेर पालिका प्रशासनाने विरोध करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यास सुरवात केल्यामुळे कचरा उचलण्यासाठीचा विरोध कमी झाला. (प्रतिनिधी)
कार्यालयात कचरा
आंदोलकांनी वाशी विभाग कार्यालयामध्ये कचरा टाकला. याशिवाय शहरातील कचरा कुंड्या उलट्या करून कचरा रस्त्यावर पसरविला. शहरवासीयांची अडवणूक करण्यासाठी हे सर्व प्रकार केल्याने नागरिकांमध्ये कामगारांविषयी असलेली सहानुभूती कमी होवू लागली आहे.