वाहतूक कोंडीने नवीन पनवेलकर त्रस्त
By Admin | Updated: September 1, 2016 03:29 IST2016-09-01T03:29:47+5:302016-09-01T03:29:47+5:30
नवीन पनवेल म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. चालण्यासाठी फुटपाथ नाहीत, यामुळे जीव मुठीत घेऊन रस्ता शोधत चालण्याची सवय आता नवीन पनवेलकरांना झाली

वाहतूक कोंडीने नवीन पनवेलकर त्रस्त
नितीन देशमुख, नवीन पनवेल
नवीन पनवेल म्हणजे वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे. चालण्यासाठी फुटपाथ नाहीत, यामुळे जीव मुठीत घेऊन रस्ता शोधत चालण्याची सवय आता नवीन पनवेलकरांना झाली आहे, यातून आपली सुटका नाही याची खात्री झाल्याने ते आला दिवस ढकलत आहेत. यावर्षी वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी गणेशाला साकडे घालण्याचा विचारही काहींनी बोलून दाखवला.
नवीन पनवेल सिडकोने वसवले. येथे अनेक सोसायट्या झाल्या, वस्ती वाढली मात्र येथील नागरिकांना सुविधा पुरवण्यात सिडको कमी पडली आहे. नवीन पनवेलच्या प्रवेशव्दारापासूनच वाहतूक कोंडीला सुरु वात होते. रेल्वे पूल ओलांडल्यावर एचडीएफसी सर्कलजवळच प्रथम वाहतूक कोंडीला सुरु वात होते. या ठिकाणी अनेक वेळा १५ ते २० मिनिटे लागतात. येथून पुढे रेल्वे स्टेशनकडे वळलो की रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवत वाहन चालकांची तारांबळ उडते. त्यातच कर्नाळा बँकेच्या पुढे कचरा कुंड्या रस्त्यावरच आहेत, त्यामुळे रस्ता अरु ंद झाला आहे. त्यापुढे बिकानेर कॉर्नरजवळ रस्त्यावर उभ्या केलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांनी रस्ता जाम असतो. त्यातच हातगाडीवाले, भाजीवाल्यांनी फुटपाथ अडवलेला आहे, त्यामुळे तेथे सतत वाहतूक कोंडी असते. सेक्टर १५ मध्ये असलेल्या सिडकोच्या पी ६ समोरील रस्त्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहने फुटपाथवर उभी करून जातात, यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण होत आहे. रेल्वे स्टेशनजवळ एनएमएमटीचा थांबा आहे. हा रस्ता एकेरी वाहतुकीचा असूनही खाजगी वाहनचालक व रिक्षाचालक नियम पाळत नाहीत. रस्त्याच्या सुरवातीलाच वाहने उभी करून ठेवल्याने बस थांब्यावर आणता येत नाहीत. चालकाला नाईलाजाने बस बाहेरून न्यावी लागल्याने प्रवाशांचे हाल होतात. रेल्वे स्टेशनजवळ दुचाकी वाहनांसाठी असलेला वाहनतळ लहान आहे. नवीन पनवेलला सुरवातीला जागांचे दर कमी होते त्यामुळे अनेकांनी जागा घेतल्या. त्यानंतर विचुंबे, सुकापूर, नेरेपर्यंत राहायला जागा घेतल्या. लांब अंतरावर जागा स्वस्तात मिळाल्यावर थोडे पैसे टाकून येण्या- जाण्यासाठी दुचाकी घेतल्यामुळे त्यांची संख्या मोठी आहे. कामावर जाताना गाड्या नाईलाजाने रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही जण पैसे वाचवण्यासाठीही रस्त्यावर वाहने उभी करतात. अनेक वेळा सोसायटीतील आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे असल्यास गेटसमोर वाहने उभी असल्याने रहिवाशांना आपली गाडी बाहेर काढता येत नाही. वाहतूक पोलीस याबाबत कोणतीही कारवाई करीत नाहीत, याबद्दल स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
वाहतूक विभागाला पत्र
अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेने नगराध्यक्षा चारु शीला घरत व वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विजय काडवणे यांना काही दिवसांपूर्वी सायंकाळी परिस्थिती दाखवली. त्यावेळी पोलीस निरीक्षक विजय काडवणे यांनी एचडीएफसी सर्कलजवळची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिडकोकडे सर्कल लहान करण्यासाठी वाहतूक विभागाने पत्र दिले आहे. त्याला मंजुरी मिळेपर्यंत सर्कलच्या पुढील दुभाजक कमी केल्यास कोंडी कमी होईल. मात्र त्याला सिडकोकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही असे सांगितले. आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे मात्र सायंकाळी बिकानेर कॉर्नरला वाहतूक पोलीस ठेवण्यात येईल असेही संगितले. या वेळी नगराध्यक्षा चारु शीला घरत यांनी वाहतूक शाखेसाठी नगरपालिकेकडून ५० जामर देण्यात येत असल्याचे संगितले. वाहतूक नियंत्रणासाठी शाळेतील स्काऊटच्या मुलांची मदत घेण्याचे सुचवले. याशिवाय वाहनतळ दुमजली बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.