आज ‘कशी असावी महानगरपालिके’वर चर्चा
By Admin | Updated: June 11, 2016 02:38 IST2016-06-11T02:38:09+5:302016-06-11T02:38:09+5:30
सध्या शहरात होऊ घातलेल्या पनवेल महापालिकेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

आज ‘कशी असावी महानगरपालिके’वर चर्चा
पनवेल : सध्या शहरात होऊ घातलेल्या पनवेल महापालिकेबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. या महापालिकेबाबत नागरिकांना काय वाटते, भविष्यात पनवेलकरांसाठी ही महापालिका कितपत प्रभावी ठरणार, यावर चर्चा घडवून आणण्यासाठी शनिवार सकाळी १0.३0 वाजता कळंबोली येथील केएलई कॉलेजमध्ये विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यातील मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने या चर्चासत्रामध्ये उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सिटीझन युनिटी फोरम (कफ) व केएलई संस्थेचे विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय कळंबोली यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक लोकमत आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्वच क्षेत्रातील मंडळींसाठी हे व्यासपीठ खुले आहे. ‘कशी असावी महानगरपालिका’ हा चर्चेचा विषय असून आपली मते, सूचना मांडण्याची संधी सर्वांना या कार्यक्र माद्वारे मिळणार आहे. आजी- माजी सनदी अधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मातब्बर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपली मते मांडणार आहेत.
नुकत्याच जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, पनवेल महानगरपालिकेत सिडकोचे सात नोड, नैना क्षेत्रातील गावे आणि नवी मुंंबई एसईझेड क्षेत्र आणि सिडको क्षेत्रातील २१ गावांचा समावेश करण्यात आला आहे. महानगरपालिकेची अधिसूचना निघाल्यानंतर पालिकेत समाविष्ट ग्रामीण, शहरी भाग, येथील विकास, होऊ घातलेले प्रकल्प याबाबत चर्चा होत आहे. महापालिका झाल्यावर नागरिकांना होणारे फायदे, दळणवळणाच्या वाढणाऱ्या सोयी-सुविधा, आकारण्यात येणारे कर आदींवर कार्यक्रमात चर्चा होणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेल महानगरपालिकेला वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. चर्चासत्रासाठी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे, नगरविकास खात्याचे अप्पर सचिव अमित कवडे, शिवसेना उपनेते माजी सनदी अधिकारी विजय नहाटा, आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार शेकाप विवेक पाटील, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत, मुख्याधिकारी मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील, शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण, शेकापचे बाळाराम पाटील, आरपीआयचे जगदीश गायकवाड, काँग्रेसचे महेंद्र घरत, राष्ट्रवादीचे शिवदास कांबळे आदींसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.